अनिकेत निंबाळकर : देशात गेले 2 महिने कोरोनाने चांगलाचं मुक्काम केला. या कोरोनाने अनेकांचे रोजगार व व्यवसाय हातातून काढून घेतले. अनेक मजुरांना हतबल केले. अखेर या मजुरांनी कोरोनासमोर हात टेकवून घरी जाण्याचा निर्णय घेतला. हे मजूर रोजगारासाठी आपले राज्य-गावं सोडून महाराष्ट्र, गुजरात या विकसित राज्यांमध्ये आले. मात्र याच विकसित राज्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग अधिक असल्याने त्यांना पुन्हा इथेही बेरोजगार व्हावे लागले.
भूमिपुत्रांना संधी
आज महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, केरळ या राज्यांना विकसित राज्य म्हणून ओळखले जाते. त्यामुळे उत्तर भारतातून गेले अनेक वर्ष या राज्यांमध्ये रोजगाराच्या आणि व्यवसायाच्या निमित्ताने लाखो लोक आले. आता मात्र या लोकांचा रोजगार गेल्याने आणि महामारीच्या कचाट्यात सापडल्याने त्यांनी या राज्यातून पुन्हा आपल्या राज्यात जाण्याचा हट्ट लावून धरला. त्यांच्यामागणीनुसार या राज्यांनी त्यांच्या जाण्याची व्यवस्था देखील केली. मात्र आता कोरोना हळूहळू संपुष्टात येऊ लागला आहे. त्यामुळे या विकसीत राज्यांनी पुन्हा बंद केलेले उद्योगधंदे आणि व्यवसाय सुरु केले आहेत. मात्र आता या कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या मजुरांनी स्थलांतर केल्याने उद्योगधंद्यांमध्ये काम करायला कोणी उरलेचं नाही. त्यामुळे आता भूमिपुत्रांना या रोजगाराचा लाभ मिळवण्याची मोठी संधी चालून आली आहे.

भूमिपुत्रांसाठी केलेली तगमग, मात्र परप्रांतीयांनी मांडला ठिय्या
राज्यात भूमिपुत्रांना रोजगार मिळावा यासाठी अनेक नेत्यांनी आरडाओरडा केली. अनेक सरकारे आश्वासनं देऊन गेली. भूमिपुत्रांचे मोर्चे निघाले. कारखान्यांच्या मालकांवर दबाव टाकण्यात आला. राज्याच्या औद्योगिक विकासाच्या योजनांमध्ये भूमिपुत्रांच्या रोजगारासाठी विशेष प्राधान्य देण्यात यावे, असे नियम बनवण्यात आले. तरी देखील परप्रांतीय मजूरांंनी आपली जागा टिकवून ठेवली. ते जागचे एक पाऊल देखील हलले नाहीत. तर काही क्वचितचं भूमिपुत्रांना या सर्व खटाटोपाचा लाभ मिळाला. मात्र आता रोजगार काही दिवसांसाठीचं बंद करण्यात आला तसा या परप्रांतीयांनी आपल्या जागा लगेचचं सोडल्या. आपल्या राज्याची माती त्यांना अधिक प्रिय वाटू लागली. घरी जाण्यासाठी वाहनांची उपलब्धता नसताना देखील त्यांनी पायी अंतर कापले. मात्र ते येथे धीराने राहू शकले नाहीत.

मजुरांन अभावी कारखानदार चिंतेत !
स्थलांतर केल्याने मजुरांच्या जागी आता काम कोण करणार असा प्रश्न राज्याच्या कारखानदारांना व व्यवसायिकांना पडला. कारण गेली अनेक वर्ष आपल्या राज्यातील तरुणांनी हलके काम आहे, असे समजून पाठ फिरवलेल्या कामात परप्रांतीयांनी मात्र चांगलेचं कौशल्य दाखवले. तर आपल्या कामाच्या चिकाटीने कारखानदार मालकांची मनंं जिंकली. त्यामुळे आता भूमिपुत्रांना संधी असली तरी त्या संधीची उपलब्धता मालक लोकं बेरोजगारीच्या बाजारात करून देणारा का ? असा प्रश्न मात्र पडला आहे.
कारण काही भागात लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतरही आजच्या घडीला अनेक कारखाने हे मजुरांच्या अभावी सुरळीत सुरु झालेले नाहीत. तर स्थानिकांना त्यांच्या जागी घ्यावे तर त्या दृष्टीने कोणतेही पाऊल कंपनीच्या किंवा कारखान्यांच्या मालकांकडून उचलताना दिसले नाही. तर राज्य सरकार देखील कोरोनाच्या थैमानाने गांगरून गेल्याने यावर आता चर्चा नको, असे म्हणताना दिसत आहे. यावर सर्व स्थिरस्थावर झाल्यावर चर्चा करू, असे सरकारकडून सांगण्यात येत आहे. सरकारचेही बरोबर आहे म्हणा ! कारण राज्यावर आता तिहेरी बाजूने संकट आले आहे. एका बाजूने कोरोना, दुसऱ्या बाजूने आर्थिक टंचाई, आणि तिसऱ्या बाजूने विरोधी पक्ष या तिघांच्या कचाट्यात सरकार चांगलेच सापडलं आहे. त्यामुळे आता तरी राज्य सरकारकडून या भूमिपुत्रांच्या कल्याणाच्या दृष्टीने काही उपययोजना होईल अशी अपेक्षा करणे कठीण आहे.

नोकरी नसली तरी भूमिपुत्रांना व्यवसायाची मोठी संधी
मात्र आजच्या घडीला तरी भूमिपुत्रांना रोजगार मिळवण्याची मोठी संधी उपलब्ध आहे, हे देखील खरंं आहे. कारण कारखान्यांमध्ये जरी जागा नसली तरी अनेक व्यवसाय जे परप्रांतीयांनी हस्तगत केले होते. ते आता मात्र खुले झाले आहेत. आज गवंडी काम कारणारे, फर्निचरचे काम करणारे, रस्त्याची काम करणारे, कपडे शिवण्याचे काम करणारे, घरांना रंग लावणारे असे अनेक क्षेत्रात काम करणारे मजूर हे आता स्थलांतरीत झाले आहेत. त्यामुळे यांची जागा घेण्याचे कौशल्य आपल्या भूमिपुत्रांनी दाखवणे अपेक्षित आहेत. आज मुंबई पुण्यात अनेक ठिकाणी याचं परप्रांतीयांनी आपल्या कामाच्या जोरावर यासर्व दैनंदीन जीवनात लागणाऱ्या क्षेत्रांवर आपली पकड मजबूत केली होती. त्यामुळे या मजुरांच्या जाण्याचा फटका मात्र मोठ्या शहरांना काही दिवस सहन करावा लागणार आहे. जर हीच कमी भूमिपुत्रांनी भरून काढली तर राज्याला मजुरांची आणि त्यांच्या स्थलांतराची कमी भासणार नाही. मात्र जर या मजुरांची काम स्वतः करताना भूमिपुत्राचा अहम जर मध्ये आला तर मात्र या राज्या पुढे मोठे संकट उभं राहण्याची शक्यता आहे.

…तर राज्याला परप्रांतीयांची कमी जाणवणार का ?
आज नाही म्हंटल तरी परप्रांतीयांच्या जीवावर राज्यातील अनेक उद्योजकांनी आपले उद्योग थाटले आहेत. त्यामुळे मजुरांच्या स्थलांतराचा परिणाम अशा उद्योजकांच्या उद्योगावर होणार आहे. आज अनेक ठिकाणी सफाई कामगार हे परप्रांतीय असतात. तर हॉटेलमध्ये टेबलवर फडके मारणाऱ्या पासून ते आचार्यापर्यंत काम करणारे हे परप्रांतीय आहेत. आणि हेच काम करणारे मजूर हे स्थलांतरीत झाले आहेत. त्यामुळे अशी कामं भूमिपुत्रांना संधी मिळाल्यास करायला आवडणार आहे का ? असा प्रश्न मात्र निर्माण होत आहे. अशी काम करण्यात आपल्या मुलांना कमीपणा वाटतो मात्र याच कामाकडे परप्रांतीय मजूर हे रोजगार म्हणून पाहतात. त्यामुळे भूमिपुत्रांना संधी असली तर परप्रांतीय मजुरांची कमी जाणवणार का ? हा प्रश्न मात्र शेवटी आपल्याला भेडसावणार असल्याचं दिसत आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

