जालना : मराठवाड्यात औरंगाबादसह जालना जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. प्रशासनाने विविध खबरदारी घेऊनही संसर्ग फैलावतच आहे. यामुळे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी चिंता व्यक्त केली. कोरोना रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करा. जालना जिल्ह्यात कोरोनामुळे एकाचाही मृत्यू होता कामा नये आदेशच पालकमंत्री राजेश टोपे यांनी दिलेत. तसेच विनामास्क फिरणाऱ्यांना दयामाया दाखवू नका. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करा, अशी कडक तंबी अधिकाऱ्यांना दिलीय.
जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी सर्व विभांगाचे प्रमुख उपस्थित होते. जालना जिल्ह्यात ट्रेसिंग व टेस्टिंगची संख्या वाढविण्यात यावी. जालना जिल्ह्यासाठी स्वतंत्र अशी आरटीपीसीआर लॅब असून या लॅबची दरदिवसाची क्षमता एक हजार स्वॅब तपासणीची असून दरदिवशी एक हजार टेस्ट झाल्याच पाहिजेत. एक हजार स्वॅबपेक्षा अधिक स्वॅब गोळा करण्यात आल्यास अहवालास उशिर होऊ नये. यादृष्टीने स्वॅब औरंगाबाद अथवा पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात यावेत, असे आदेशही त्यांनी यावेळी दिले.
कोरोनाबाधित रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत यादृष्टीने बेडचे व्यवस्थित व निटनेटके नियोजन करण्याबरोबरच खासगी रुग्णालयांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांकडून अधिकचे पैसे तर घेण्यात येत नाही ना याबाबत खात्री करण्यात येऊन रुग्णांकडून उपचारापोटी देण्यात येणारी देयकांची लेखा परिक्षकांमार्फत नियमितपणे तपासणी करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
कोरोना बाधितांच्या संपर्कामधील सहवासितांचा अचूकपणे शोध घेऊन त्यांचे अलगीकरण करण्यावर भर देण्यात यावा. साधारणपणे एका बाधित व्यक्तीच्या संपर्कातील 20 व्यक्तींचा शोध घेण्यात येऊन त्यांचे तातडीने अलगीकरण करण्यात यावे. कोरोना बाधितांच्या सहवासितांचा डेटा नियमितपणे अपलोड होईल, यादृष्टीनेही काळजी घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
महत्वाच्या बातम्या
- दागिने बनविणाऱ्या बंगाली कारागिरांनी लांबवले ७७ तोळ्यांचे दागीने
- योगीजींच्या नेतृत्वात उत्तर प्रदेश निरंतर प्रगतीपथावर राहून ‘सर्वोत्तम प्रदेश’ बनावा – नाईक
- मुंबईत आज पासूनच कडक निर्बंध लागू होऊ शकतात – महापौर किशोरी पेडणेकर
- सचिन वाझे आणि हिरेन यांचे ‘ते’ सीसीटीव्ही फुटेज आले समोर
- कर्नाटकने महाराष्ट्रातून येणाऱ्या बसेसना बंदी घातली


