मुंबई : सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागांतर्गत लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ प्रत्यक्ष ऊसतोड कामगारांना देण्यात येत आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यातील ऊसतोड कामगार व त्यांच्या कुटुंबीयांची नोंदणी ग्रामसेवकामार्फत करून त्यांना ओळखपत्र देण्याचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. कुठल्याही दस्तऐवजात ‘ऊसतोड कामगार’ अशी नोंदणी नसलेल्या लाखो असंघटित ऊसतोड कामगारांच्या जीवनाशी निगडित, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे हे महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.
नोंदणी या वर्षीच्या सिझनला कामगार स्थलांतरीत होण्यापूर्वीच केली जावी. नोंदणी करताना स्थानिक राजकारण, गाव स्तरावरील गटबाजी किंवा पक्षपात अशा कोणत्याही बाबीचा परिणाम नोंदणीवर न होऊ देता पारदर्शक पद्धतीने सरसकट ऊसतोडणी कामगारांची नोंदणी करून त्यांना ओळखपत्र दिले जावे, अशा स्पष्ट सूचना सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी केल्या आहेत.
‘पिढ्यानपिढ्या ऊसाच्या बुडावर कोयत्याने घाव घालून अनेक हाल-अपेष्टा सोसलेल्या ऊसतोड कामगारांच्या हातांनी स्वतःची व आपल्या मुला-बाळांची उपेक्षा सहन करत आपली साखर गोड केली. आता या कष्टकरी हातांच्या ऋणातून उतराई होण्याची आपली बारी आहे, त्यासाठी कामगारांची व त्यांच्या कुटुंबियांची पारदर्शक पद्धतीने नोंदणी होणे हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा असल्याच्या भावना धनंजय मुंडे यांनी व्यक्त केल्या आहेत. तसेच जिल्हा स्तरावरून यासंबंधीचे अनुषंगिक आदेश ग्रामसेवकांना देण्यात यावेत व निर्धारित वेळेत ही प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी अशा सूचनाही धनंजय मुंडे यांनी संबंधितांना केल्या आहेत.
स्थानिक ग्रामसेवकांकडे कागदपत्रे जमा करावीत
महामंडळांतर्गत संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजना, आरोग्य विमा या व यासारख्या अन्य योजनांचा लाभ देण्यासाठी ऊसतोड कामगार नोंदणी करून त्यांना ओळखपत्र देणे गरजेचे आहे. यासाठी संकलित केलेली माहिती संपूर्ण संगणकीकृत करून एका अॅप द्वारे नोंदणी व ओळखपत्र प्रक्रिया आणखी सुलभ करण्यात येणार आहे. ऊसतोड कामगारांनी आवश्यक माहिती व कागदपत्रे वेळेत ग्रामसेवकांकडे जमा करून आपली नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी असे सांगण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- माझ्या हाती अजून तीन बड्या नेत्यांची प्रकरणे, कितीही धमक्या दिल्या तरी मी थांबणार नाही- किरीट सोमय्या
- ‘अतिशय भयंकर आणि संतापजनक; अत्याचारांच्या प्रकरणामुळे चीड येतेय’, फडणवीसांचा संताप
- भाजपा सरकारच्या काळात महाराष्ट्रात पोलिसांचा दबदबा होता; चंद्रकांतदादांचा दावा
- ‘महाविकास आघाडीच्या एकीवर काँग्रेसला विश्वास नाही का?’, ‘त्या’ भेटीवर सेना-राष्ट्रवादीत नाराजीची चर्चा
- ‘फडणवीस आमचा मान ठेवतील, शब्द मोडणार नाहीत’, राज्यसभा उमेदवारीवरून काँग्रेस नेत्यांना विश्वास


