🕒 1 min read
पुणे : ”राष्ट्रवादीचे एक नेते म्हणतात ६० तर दुसरे म्हणतात ५० जिंकू…आहेत त्या आठ टिकल्या तरी खूप झाले. बेडूक कितीही फुगला तरी त्याला अन्य कोणताही प्राणी थोडं होता येत? ज्या पक्षाला मुंबईत अध्यक्ष मिळायची मारामारी ते निघाले पालिकेच्या मिशनवर..विनोदीच आहे सगळं!पालिकेत अबकी बार भाजपा सरकार!, असे म्हणत भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मिशन २०२२ वर हल्लाबोल केला.
आता राष्ट्रवादी- भाजपमध्ये सुरु असलेल्या ट्वीट वॉरमध्ये आता सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडें यांनीही उडी घेत आशिष शेलार यांच्यावर सडकून टीका केली. आशिष शेलारांच्या या ट्वीटला धनंजय मुंडे यांनी ट्वीट करूनच प्रत्युत्तर दिले आहे. ‘पक्षी फडफडायला लागला की समजायचं नेम अचूक बसलाय…” असे ट्वीट मुंडे यांनी केले आहे.
तसेच राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीदेखील ट्वीट करत शेलारांना सुनावले आहे. ” भारतीय जनता पक्षाचे सुरवातीला दोन खासदार होते. आज केंद्रात फक्त तुमच्या पक्षासाठी आलेले ‘अच्छे दिन" हे तुमच्या पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमुळे आहेत आणि राज्यातले तुमच्या पक्षासाठी आलेले ‘बुरे दिन" हे अशाच अहंकाराचं फळ आहे. आत्ता तरी सुधरा राव.” असे म्हणत त्यांनी आशिष शेलारांना टोला लगावला आहे.
दरम्यान, “मुंबईत 36 पैकी 10 आमदार राष्ट्रवादीचे निवडून आले पाहिजेत. मुंबईत केवळ 8 नगरसेवक आहेत. यापुढे 50 ते 60 जागांवर विजय मिळाला पाहिजे. काम करताना तुमच्याजवळ असलेल्या पदाचा उपयोग समाजोपयोगी कामांसाठी करा. पक्षाची बदनामी आणि पवार साहेबांची बदनामी होऊ देऊ नका”, अशी सूचना अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीच्या मेळाव्यात केले होते. त्यावर आशिष शेलारांनी राष्ट्रवादीवर टीकास्त्र सोडले होते. मात्र धनंजय मुंडे आणि रोहित पवार यांनी ट्वीट मधूनच शेलारांचा चांगलाच समाचार घेतला आहे.


