🕒 1 min read
मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विशेष रेल्वे सोडण्याच्याबाबतीत एक विधान केले आहे. येत्या ३ मे रोजी लॉकडाऊन संपल्यानंतर राज्यातील विविध भागात थांबलेले परप्रांतीय मजूर त्यांच्या घरी जाण्यासाठी मोठ्या संख्येने बाहेर पडून गर्दी करण्याची शक्यता आहे. यासाठी मुंबई आणि पुण्यातून विशेष रेल्वे सोडण्यात यावी, अशी मागणी पवार यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांच्याकडे केली आहे.
अजित पवार यांनी थेट केंद्रीय रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांच्याकडे पत्र लिहून ही मागणी केली आहे. तर लॉकडाऊन उठल्यानंतर उद्भवणाऱ्या संभाव्य धोक्याची कल्पनाही सरकारला दिली आहे. पत्रात अजित पवारांनी लिहिलं आहे की, केंद्र सरकारने २४ मार्चपासून देशव्यापी टाळेबंदी लागू केल्यापासून उत्तरप्रदेश, बिहारसह देशाच्या विविध राज्यातील मजूरबांधव महाराष्ट्रात ठिकठिकाणी अडकून पडले आहेत. राज्य शासनातर्फे त्यांच्यासाठी शिबीर व्यवस्था केली असून त्यांना निवास, भोजन, आरोग्यसेवा पुरवण्यात येत आहे.
राज्यशासनाच्या शिबिरांमध्ये आजमितीस साडेसहा लाख मजूर राहत आहेत. स्वयंसेवी संस्थांद्वारेही तितक्याच मजूरांची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. टाळेबंदीमुळे राज्यातील उद्योग, बांधकाम. सेवाक्षेत्र बंद असल्यामुळे या मजूरांच्या हाताला काम नाही. दीड महिन्यांपासून शिबिरात राहिल्यामुळे ही मंडळी आपापल्या घरी, कुटुंबात जाण्यास अधीर आहेत.
पहिल्या देशव्यापी टाळेबंदी समाप्तीच्या दिवशी मुंबईतील वांद्रे परिसरात उसळलेली गर्दी त्याच अधीरतेचे उदाहरण आहे. रेल्वे मंत्रालयाने सदर वस्तुस्थितीचा विचार करून टाळेबंदीची मुदत संपल्यानंतर, ज्यावेळी रेल्वेसेवा सुरू होतील, तेव्हा महाराष्ट्रातील परप्रांतीय मजूरांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी, मुंबई व पुण्यातून विशेष रेल्वेगाड्या सोडल्यास, या मजूरांना सुरक्षित घरी जाता येईल तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याचा धोका टाळता येईल, असं पवार यांनी म्हटलं आहे.
RAW : Research Analysis Wing | #भारताची_गुप्तहेर_संघटना
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
