मुंबई : महाराष्ट्रातील डॉक्टरांना कोरोनाविरुद्धच्या लढ्याला यश येताना दिसत आहे. कारण काल पुण्यातील कोरोनाबाधित पहिलं दाम्पत्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर आता मुंबईतील तब्बल १२ रुग्णांचा दुसरा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयातील तब्बल १२ रुग्ण हे कोरोना विषाणूमुक्त झाले असं म्हणायला हरकत नाही. मुंबई महानगरपालिकेच्या डॉक्टरांनी केलेल्या प्रयत्नांमुळे कस्तुरबा रुग्णालयातील १२ रुग्ण कोरोना विषाणूपासून मुक्त झाले आहेत.
या विषाणूची लागण होऊ नये म्हणून मुंबईकरांनी घराबाहेर पडू नये, गर्दीत जाऊ नये तसेच विषाणूची लागण झाल्यास थेट रुग्णालयात भरती व्हावे, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाच्या उप मुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शाह यांनी केले आहे.
दरम्यान, दुसरीकडे महाराष्ट्रात 9 मार्च रोजी पहिले दोन कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. हे दोन्ही रुग्ण पती-पत्नी होते. ते वीणा ट्रॅव्हल्समार्फत 1 मार्चला दुबईवरुन आले होते. त्यांना 6 मार्चपर्यंत कोणतेही लक्षणं दिसली नाहीत.
मात्र, 9 मार्च रोजी पत्नीला कोरोनाची लक्षणं जाणवायला लागले. म्हणून त्यांनी तपासणी केली. दोघांचीही रक्त तपासणी केली असता, ते कोरोना पॉझिटीव्ह निघाले. यानंतर तातडीने त्यांना पुण्याच्या नायडू रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करुन उपचार सुरु केले होते.
दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाची सर्वात अगोदर लागण झालेल्या दाम्पत्याची प्रकृती ठणठणीत झाली आहे. त्यांना लवकरच डिस्चार्ज मिळणार आहे. याबाबत पुणे महापालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड यांनी माहिती दिली आहे. त्यामुळे राज्यातील डॉक्टरांचे सर्वच स्थरातून कौतुक होत आहे.


