मुंबई : भारतामध्ये कोरोना बाधितांची संख्या 2014 वर पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात आतापर्यंत 41 लोकांचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. तर 169 लोक ठीक झाले आहेत. आरोग्य मंत्रालयाने बुधवारी सांगितलं की, 24 तासांमध्ये 386 कोरोनाचे रूग्ण आढळून आले आहेत. तर तीन लोकांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीतील निजामुद्दीनमध्ये तब्लिकी समाजाच्या धार्मिक कार्यक्रमामुळे कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे.
या साथीचा सर्वाधिक परिणाम महाराष्ट्रात झाला आहे. येथे कोरोनाचे ३०० हून अधिक रुग्ण आढळले आहेत. दरम्यान, कोरोना विषाणूने आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या मुंबईतील धारावी झोपडपट्टीमध्ये शिरकाव केला आहे. येथे कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला आहे.
हा रुग्ण ५६ वर्षांचा असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्याच्या कुटुंबातील ८ ते १० जणांना क्वारंटाइन करणयात आलं आहे. ज्या इमारतीत हा रूग्ण राहत आहेत त्या इमारतीला सील करण्यात आलं आहे. धारावी १५ लाख लोकं राहतात. धारावी हे ६१३ हेक्टर क्षेत्रावर पसरले आहे. धारावीमध्ये लाखो मजुरी करणारे आणि छोटे व्यापारी राहतात.
बुधवारी महाराष्ट्रात कोरोनाचे १८ नवीन रुग्ण आढळले. महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. आतापर्यंत फक्त बाहेरुन येणाऱ्या लोकांना कोरोना झाला होता. पण आता तो येथील सामान्य माणसापर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे भारतासाठी ही धोक्याची घंटा आहे. आतापर्यंत फक्त श्रीमंतामध्ये आढळलेला कोरोना आता राज्यातील गरीब व्यक्तींपर्यंत पोहचण्यास सुरुवात झाली आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

