मुंबई : राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या २२ हजार १७१ झाली आहे. आज १२७८ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज ३९९ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ४१९९ रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २ लाख ३८ हजार ७६६ नमुन्यांपैकी २ लाख १५ हजार ९०३ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत तर २२ हजार १७१ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात २ लाख ४४ हजार ३२७ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून १४ हजार ४६५ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
आज राज्यात ५३ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण संख्या ८३२ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी मुंबई मधील १९, पुण्यातील ५, जळगाव शहरात ५, धुळे शहरात २, धुळे ग्रामीण भागात १, पिंपरी चिंचवड मध्ये १, अहमदनगरमध्ये १, औरंगाबाद शहरात १, नंदूरबारमध्ये १, सोलापूर शहरात १ तर वसई विरारमध्ये १ मृत्यू झाला आहे. मालेगाव शहरातील १४ मृत्यू हे २७ एप्रिल ते १० मे २०२० या कालावधीतील आहेत. त्यांची नोंद आज घेण्यात आली आहे. याशिवाय मध्यप्रदेशमधील एक मृत्यू आज मुंबई येथे झाला आहे.
‘शेतकऱ्यांची खरीप हंगाम पेरणीपूर्व कामे लॉकडाऊनमुळे रखडू नयेत याची दक्षता घ्या’
आज झालेल्या मृत्यूंपैकी ३३ पुरुष तर २० महिला आहेत. आज झालेल्या ५३ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील १९ रुग्ण आहेत तर ३० रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ४ जण ४० वर्षांखालील आहे. रुग्णांना असणाऱ्या इतर आजारांबाबत १७ जणांची माहिती अप्राप्त आहे. उर्वरित ३६ रुग्णांपैकी २७ जणांमध्ये (७५ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.


