मुंबई : खरीप हंगामाच्या दृष्टीने सर्व कृषी सेवा केंद्रे तसेच कृषी साहित्याची विक्री आणि दुरुस्ती करणारी दुकाने पूर्ण वेळ उघडी राहतील तसेच या दुकानांवर गर्दी होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी, असे निर्देश कृषिमंत्री दादा भुसे यांनी सांगितले आहे.
खरीप हंगामासाठी जिल्हा प्रशासनाने याकाळात कोणती दक्षता घेतली पाहिजे यासाठी मुख्य सचिव अजोय मेहता यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्राद्वारे सूचना दिल्या आहेत.
तसेच ‘खरीप हंगामासाठी शेतकरी तयारी करीत असताना लॉकडाऊनमध्ये पेरणीपूर्व कामे, शेतमजुरांची ये-जा, खते, बियाण्यांची वाहतूक आणि विक्री व्यवस्था आदी शेतीशी निगडीत कामे लॉकडाऊन परिस्थितीत रखडणार नाहीत, याची खबरदारी जिल्हा प्रशासनाने घ्यावी, असे आदेश कृषिमंत्री भुसे यांनी दिले.
वाचा राज्यातील करोना स्थिती
राज्यात काल कोरोनाच्या 841 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 15,525 असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. दरम्यान, काल राज्यात 34 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल झालेल्या मृत्यूपैकी 26 जण मुंबईचे तर पुण्यातील 6 आणि औरंगाबाद, कोल्हापुरात प्रत्येकी एका रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत 617 जणांचा मृत्यू झाला आहे. काल 354 कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.


