टीम महाराष्ट्र देशा- कुणाची तरी दुकाने बंद झाल्यानेच मुख्यमंत्री बदलाची चर्चा सुरू झाल्याचे म्हणत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे. मराठा आरक्षणावरून राज्यात निर्माण झालेली परिस्थिती हाताळण्यात सरकारला अपयश आले असून मुख्यमंत्री बदलाची चर्चा भाजपात सुरू झाली असल्याचा दावा शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी केला आहे. राऊत यांचा दावा पाटील यांनी फेटाळून लावला आहे .
मराठा आरक्षणावरून राज्यभर आंदोलनाचा वणवा पेटला असताना शिवसेनेने पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांना टार्गेट केले आहे. त्यातच मुख्यमंत्री बदलाची चर्चा भाजपात सुरू असल्याचे खळबळजनक विधान शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले. चंद्रकांत पाटील यांनीही ही शक्यता पूर्णपणे फेटाळून लावत मुख्यमंत्री बदलण्याचे कारणच काय ? असा सवाल केला. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आपल्यापेक्षा मुख्यमंत्री अधिक प्रयत्नशील असून ते यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करीत असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे. राज्यात नेतृत्वबदलाची मुळीच गरज नसून कुणाची तरी दुकाने बंद केल्यानेच हे असले चर्चेचे उपद्व्याप सुरु असल्याचे पाटील म्हणाले. ब्राह्मण मुख्यमंत्री नको, असं कोणाच्याच मनात नाही, असाही निर्वाळा त्यांनी दिला.
हातापाया पडतो पण मराठ्यानो आंदोलन मागे घ्या : चंद्रकात पाटील
संजय राऊत यांचे ट्वीट शेलारांना झोंबले; शिवसेना-भाजपमध्ये ट्वीटरवॉर


