नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवला आहे. ही चांगली गोष्ट आहे. त्यामुळे लॉकडाऊनचे नियम सर्वांना पाळायचे आहेत. या काळात रेल्वे आणि विमान सेवा सुरू होणार नाही. तर दुसऱ्या बाजूला करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्दी आणि तापाची लक्षणं असलेल्या रुग्णांची राज्य सरकार चौकशी करण्याच्या तयारीत आहे.
सध्या संपूर्ण देशभरात करोना विषाणूने थैमान घातलं आहे. परिस्थितीचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने ३ मे पर्यंत लॉकडाउन वाढवलेलं आहे. आजही देशातील महत्वाच्या शहरांमध्ये करोना बाधित रुग्ण सापडत आहेत. करोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ नये याकरता, तेलंगणा, आंध्र प्रदेश, बिहार आणि महाराष्ट्र या चार राज्यांनी मेडीकल दुकानांना सर्दी-तापाची औषधं घेणाऱ्या व्यक्तींची माहिती, नाव व पत्ता घेण्याचे आदेश दिले आहेत.
देशव्यापी लॉकडाउनदरम्यान ई-कॉमर्स कंपन्यांना जीवनावश्यक नसलेल्या वस्तूंची विक्री करता येणार नसल्याचे केंद्र सरकारे स्पष्ट करत यू-टर्न घेतला आहे. या पूर्वी केंद्र सरकारने ई-कॉमर्स कंपन्यांना २० एप्रिलपासून जीवनावश्यक वस्तूंव्यतिरिक्त इतर वस्तू विकण्याची परवानगी दिली होती.केंद्रीय गृहमंत्रालयाने ट्विट करत हा निर्णय जाहीर केला आहे. लॉकडाउनच्या काळात ई-कॉमर्स कंपन्यांवर अनावश्यक वस्तू विकण्यास असलेली बंदी कायम राहील, असे केंद्रीय गृहमंत्रालयाने ट्विटद्वारे स्पष्ट केले आहे.
दरम्यान, राज्यात शनिवारी ३२८ नवीन रुग्णांचे निदान झाले असून, करोनाबाधित रुग्णसंख्या ३६४८वर गेली आहे. गेल्या २४ तासात ११ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून, त्यात मुंबईतील पाच, पुण्यातील चार आणि ठाणे व औरंगाबाद महापालिका हद्दीतील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. यामुळे राज्यात एकूण करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची संख्या २११ झाली आहे.


