मुंबई : राज्यातल्या ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल संमिश्र लागले आहेत. राज्यातले प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षांनी आपापल्या क्षेत्रांवर पुन्हा वर्चस्व सिद्ध केले आहे.
ग्रामपंचायतीच्या निवडणुका या राजकीय पक्षाच्या अधिकृत चिन्हावर होत नसल्यामुळे, सर्वच राजकीय पक्षाचे नेते निवडून आलेल्या उमेदवारांना ‘आपले’ म्हणत आहेत. त्यामुळे सरपंच निवडणुकीनंतरच ग्रामपंचायत निवडणुकीतले पक्षीय बलाबल स्पष्ट होणार आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीत मराठवाड्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना, आम आदमी पार्टी, एमआयएम तसंच वंचित बहुजन आघाडीने लक्षवेधी कामगिरी केली. उस्मानाबाद जिल्ह्यात परंडा तालुक्यातल्या रोसा ग्रामपंचायतीवर, वंचित बहुजन आघाडीने विजय मिळवला.
दरम्यान, राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या जाहीर झालेल्या निकालांपैकी 5 हजार 721 ठिकाणी यश मिळवत भारतीय जनता पार्टी सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष ठरला आहे. तीनही सत्ताधारी पक्षांपेक्षा अधिक जागा मिळवत भाजपाने आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिध्द केले आहे, अशी प्रतिक्रिया माध्यम विभाग प्रमुख विश्वास पाठक यांनी व्यक्त केली.
पाठक यांनी प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, 14 हजार 228 ग्रामपंचायतीपैकी 13 हजार 866 जागांचे निकाल हाती आले असून त्यापैकी भाजपाने 5 हजार 721 ग्रामपंचायती जिंकल्या आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपा हा सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष ठरला आहे. पाच वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीत भाजपाने ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत निर्विवाद यश मिळवले होते. त्याच यशाची पुनरावृत्ती यावेळी झाली आहे.
भाजपाचे ग्रामीण भागातील वर्चस्व ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालातून पुन्हा सिध्द झाले आहे. सत्तेत असलेल्या तीनही पक्षांनी एकत्रित निवडणुक लढवूनही त्यांना भाजपाच्या आव्हानांचा सामना करता आलेला नाही असेच हे निकाल सांगतात, असे पाठक यांनी पत्रकात नमूद केले आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने ग्रामीण भागाच्या विकासासाठी आखलेल्या योजना तसेच मोदी सरकारने प्रत्यक्षात आणलेल्या अंत्योदयाची योजना यामुळे ग्रामीण भागातील जनतेने भाजपावर विश्वास प्रकट केला आहे असेही पाठक यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
- मोठा निर्णय : महाराष्ट्र विधानमंडळ जनतेसाठी खुले होणार…
- परतफेडीची मागणी करत ‘डीएचएफएल’ च्या ठेवीदारांचा पिरामल समूहाच्या प्रस्तावाला विरोध !
- ‘चिन्यांच्या घुसखोरीबाबत मिठाची गुळणी धरून बसणार नाहीत, अशी जनतेला अपेक्षा’
- मुलींच्या जुडो कराटे, योगा व जीवन कौशल्य प्रशिक्षणाच्या अनुदानात वाढ
- राज्यात आतापर्यंत १४ हजार ८८३ कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरण पूर्ण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
