कोल्हापूर: भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांची राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करताना जीभ घसरली आहे. धनगर आरक्षणाच्या मुद्यावरून टीका करताना पवार म्हणजे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहेत, असं पडळकर म्हणाले आहेत. या विधानामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पडळकर बोलताना चुकिले असल्याचं मान्य करतानाच राष्ट्रवादीच्या नेत्यांना देखील प्रश्न विचारला आहे.
माझ्याबद्दल कोणीही काही बोलतं, देवेंद्र फडणवीस आणि मला कोणतीही टोपण नावं ठेवता? ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, राष्ट्रवादी काँग्रेसला हे चालतं का ? असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला आहे.
पडळकर यांच्या मनात शरद पवार यांच्याविषयी आदर आहे. ते एक समजूतदार कार्यकर्ता असून बोलताना त्यांचे शब्द चुकले आहेत. पवार यांचा अनादर करण्याचा त्यांच्या हेतू नव्हता. फडणवीस यांनी त्यांना शब्द जपून वापरण्याची समज दिली आहे. राजकारणात शब्द जपून वापरावे लागतात. कारण त्याची जखम खूप दिवस राहते. गोपीचंद शब्द चुकला, पण इतरांनी काहीही बोललेलं चालतं का? असा प्रश्न चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
काय म्हणाले होते गोपीचंद पडळकर
शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला करोना आहेत. त्यांनी बहुजन समाजावर अन्याय केला. ते धनगर समाजाच्या आरक्षणासंबंधी सकारात्मक नसून फक्त राजकारण करत आहेत, अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.
जुन्या सहकाऱ्याकडून पडळकर यांचा समाचार
कधीकाळी पडळकर यांचे सहकारी राहिलेले राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर यांनी देखील त्यांच्या विधानाचा समाचार घेतला आहे. धनगर समाजाला आरक्षण देतो म्हणणाऱ्या नरेंद्र मोदी यांना दगलबाज तर फडणवीस यांना भामटा म्हणता येऊ शकत, पण आमची ती संस्कृती नाही. पडळकर हे केवळ प्रसिद्धीसाठी भडक विधाने करत आहेत, अशी टीका जानकर यांनी केली आहे.


