🕒 1 min read
मुंबई: सांगली मिरज कुपवाड महापौर निवडणुकीत महाविकास आघाडीकडून भाजपाला मोठा धक्का बसला आहे. बहुमत असलेल्या महापालिकेत महापौर निवडीवेळी पक्ष शाबूत ठेवण्याबरोबरच बंडखोरी टाळण्याचं आव्हान पेलण्यात भाजपाला अपयश आलं आहे. सांगली पालिकेत महापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा विजय झाला आहे. तर उपमहापौरपदी काँग्रेसच्या उमेदवाराची निवड झाली आहे. सत्ताधारी भाजपाला पालिकेत बंडखोरीचा मोठा फटका बसला असून हातातील सत्ता गमावली आहे.
त्याचबरोबर जळगाव महापालिकेच्या महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक पार पडली आहे. एकूण ७५ नगरसेवकांपैकी ५७ नगरसेवक भाजपचे, १५ नगरसेवक शिवसेनेचे तर ३ एमआयएमचे आहेत. मात्र, जळगाव महापालिकेवर शिवसेनेचा झेंडा फडकावला असून गेल्या आठवड्याभरात मोठं राजकीय नाट्य रंगलं होतं. महापालिकेच्या महापौरपदी शिवसेनेच्या जयश्री महाजन यांची निवड झाली आहे. जयश्री महाजन यांना 45 मत पडली आहेत. तर भाजपच्या उमेदवार प्रतिभा कापसे यांना 30 मतं पडली आहेत. बहुमतासाठी ३८ मतांची गरज शिवसेनेला होती. त्यामुळे अवघे १५ नगरसेवक असूनही तिप्पट बलाढ्य भाजपला शिवसेनेनं आपल्या बाणाने घायाळ केलं आहे. यावरून सांगलीत, जळगावात सत्ताबदल झाला. त्याला फार मोठे नैतिक अधिष्ठान नसले तरी नैतिक किंवा अनैतिक यावर बोलण्याचा अधिकार भाजपने गमावला आहे. असे म्हणत आजच्या सामना अग्रलेखातून शिवसेनेने भाजपला टोला लगावला आहे.
‘सांगली महापालिकेत जयंत पाटील यांनी भारतीय जनता पक्षाचा करेक्ट कार्यक्रम केला. तेथील पालिकेतील भाजपची सत्ता उलथवून राष्ट्रवादीचा महापौर केला. हा कार्यक्रम करेक्ट व्हावा यासाठी भाजपच्या 17 नगरसेवकांनी वाऱ्याची दिशा पाहून मतदान केले. आता त्यापेक्षा करेक्ट कार्यक्रम जळगाव महानगरपालिकेतही झाला असून भाजपच्या 27 नगरसेवकांनी वाऱ्याची दिशा ओळखून शिवसेनेचा महापौर व्हावा यासाठी मतदान केले. अशातऱ्हेने सांगलीपाठोपाठ जळगावात भाजपचा गड पडला आहे. जळगावात महापौर आणि उपमहापौर शिवसेनेचाच झाला. त्यामुळे उत्तर महाराष्ट्राचे स्वयंभू बादशहा गिरीश महाजन यांना जोरदार धक्का बसला आहे.
‘सांगली-जळगावात भाजपचा कार्यक्रम एकदम करेक्ट झाला. राज्यात इतर ठिकाणीही अशा करेक्ट कार्यक्रमांचे नियोजन योग्य वेळी होईल. शेवटी सत्ता हेच हत्यार असते व सत्ता हीच संकटमोचक, कवचकुंडले ठरतात. बाकी सारे अहंकार, गर्व व्यर्थ ठरतात. वाऱ्यावरची वरात वाऱ्याच्या झुळकीबरोबरच नष्ट होते. घाऊक पक्षांतरे करून भाजपने महाराष्ट्रात पक्ष उबदार व गुबगुबीत केला, पण त्याचा पाया भक्कम नव्हता हे आता दिसून आले. पदवीधर, शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतही भाजपचे नागपूर, पुण्याचे परंपरागत गड पडले. तेथे तर लोकांचे थेट मतदान होते. भाजपच्या हातातून वाळू सरकत असल्याचे तेव्हाच स्पष्ट झाले होते.’ अशी टीका आजच्या सामना अग्रलेखातून करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘सांगली-जळगावातील करेक्ट कार्यक्रम ही तर नांदी, असे अनेक कार्यक्रम होतील !’
- ‘पैसे फेकले की सर्व विकत मिळते हा नवा सिद्धांत भाजपने रुजवला’
- ‘ठाकरे सरकार’ आल्यापासून लोकांच्या मनातले भय नष्ट झाल्याने लोक निर्भय बनून मतदान करीत आहेत’
- ‘सत्ता गेली की अक्कल, अक्कल गेली की भांडवल, भांडवल गेले की कुंपणावरचे कावळे उडून जातात’
- शिवसेनेला साथ देणं एमआयएम नगरसेवकांना भोवलं; पक्षाने केली हकालपट्टी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

