दिल्ली : जेमतेम सात वर्षांपूर्वी देशाच्या राजकारणात जन्म झालेल्या दिल्लीच्या दिलदार मुख्यमंत्र्यांची कर्मभूमी जरी दिल्ली असली तरी त्यांची जन्मभूमी ही हरियाणा आहे. १६ ऑगस्ट १९६८ रोजी हरियाणा मधील हिसार जिल्ह्यातील सिवानी मंडी येथे अरविंद केजरीवाल यांचा जन्म झाला आहे. अरविंद केजरीवाल यांचा जन्म ज्यादिवशी झाला त्यादिवशी जन्माष्टमी होती त्यामुळे देशासाठी अरविंद असलेले केजरीवाल घाण्यासाठी अजूनसुद्धा ‘कृष्ण’ आहेत.
हे खूप कमी लोकांना माहित असेल की सिवानी मंडी पासून ४ किलोमीटर दूर असलेल्या खेड़ा गावात अरविंद केजरीवाल यांचे आजोबा मंगलचंद केजरीवाल यांच्या आजोबांनी आपलं बस्तान मांडलं होत. याच ठिकाणी त्यांनी आपली दाल मिल सुद्धा उभा केली होती.
अरविंद केजरीवाल यांचे आजोबा हे एक ‘डॅशिंग’ राजकारणी होते. आता ही गोष्ट अनेकांना माहित नसेल पण हे खर आहे. वर्ष होत १९७७ इंदिरा गांधींची आणीबाणी नंतरची पहिली निवडणूक… या निवडणुकीत कॉंग्रेस हरियाणाचे दिग्गज नेते आणि माजी मुख्यमंत्री चौधरी बन्सीलाल यांचा पराभव करण्यात अरविंद केजरीवाल यांचे आजोबा मंगलचंद केजरीवाल यांचा सिंहाचा वाटा होता. चौधरी बन्सीलाल यांचा पराभव हा इंदिरा गांधी यांना मोठा फटका मनाला गेला होता.
त्यावेळी चौधरी बन्सीलाल यांचा हरियाणामध्ये बोलबाला होता. पूर्ण भवानी जिल्ह्यात त्यांच्या विरोधात जाण्याची कोणाचीच हिम्मत नव्हती. पण मंगलचंद केजरीवाल यांनी थेट बन्सीलाल यांच्याशीच पंगा घेण्याचे ठरवले होते. त्यावेळेसच्या जनता पक्षाच्या उमेदवार चंद्रावती यांचा उघड प्रचार मंगलचंद यांनी केला. फक्त प्रचारच केला नाही तर आपल्या दुकानात त्याचं कार्यलय देखील सुरु केलं. मंगलचंद यांच्या या ‘डॅशिंग’ कामामुळे चंद्रावती रेकॉर्डब्रेक मतांनी विजयी झाल्या होत्या. त्यावेळी मंगलचंद यांचं मन वळवण्याचा अतोनात प्रयत्न चौधरी बन्सीलाल यांनी केला पण शब्दाचे पक्के असणाऱ्या मंगलचंद यांनी जनता पक्षाची साथ सोडली नाही.
१९६६ ते १९७७ या कार्यकाळात चौधरी बन्सीलाल यांचा जिल्ह्यात एककल्ली कारभार सुरु होता. त्यांच्या विरोधात ब्र शब्द काढण्याची सुद्धा पूर्ण जिल्ह्यात कोणाची हिम्मत नव्हती. सिवानी मध्ये घरांवर, दुकानांवर फक्त आणि फक्त कॉंग्रेसचेच झेंडे असायचे. पण अशात मंगलचंद केजरीवाल याचं एकमेव घर अस होत कि त्यावर जनता पक्षाचा झेंडा डौलाने फडकत होता. सुरवातीला अटीतटीचा वाटणारा हा सामना जनता पक्षाच्या चंद्रावती यांनी सहज जिंकला आणि याचं श्रेय जात ते अरविंद केजरीवाल यांचे आजोबा मंगलचंद केजरीवाल यांना.

पाणी आणि वीज मोफत देऊन दिल्लीच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या अरविंद केजरीवाल यांच्या परिवाराने स्वातंत्र्यापूर्वीच मोफत पाण्याची संकल्पना सत्यात उतरवली होती. खेडा गावात केजरीवाल यांच्या परीवाराने एक छोटी विहीर खणली होती आणि संपूर्ण गावाला पाईपलाईन द्वारे पाणी पुरवठा केला होता. गावच्या सरपंच प्रमिला देवी, महेंद्र मइया, माजी सरपंच दलजीत शर्मा, संजय खेड़ा यांच्या म्हणण्यानुसार या विहिरीचे पाणी एकट्या खेडा गावात नाही तर ढाणी बल्हारा, धीरजा, ढाणी दयाचंद, ढाणी मिरान, मिरान, बख्तावरपुरा या गावांची देखील तहान भागवत होते. पण आज ही विहीर नामशेष झाली आहे. अशा ‘डॅशिंग’ आजोबांच्या नातवाने तिसऱ्यांदा दिल्लीच्या मनावर अधिराज्य गाजवत सत्तेच्या मोहिनीला गवसणी घातली आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
