🕒 1 min read
मुंबई : देशातील अस्पृश्यता निवारणाबाबत अभिनेते शरद पोंक्षे यांनी व्यक्त केलेल्या मतामुळे विवादाला तोंड फुटले आहे. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातील कार्यक्रमात अभिनेते शरद पोंक्षे यांनी हे विधान केलं होतं. ‘मी सावरकर’ वक्तृत्व स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात बोलत होते.
याच पार्श्वभूमीवर पोंक्षे यांनी केलेल्या विधानाला राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस अमोल मिटकरी यांनी उत्तर देत वेळेवर औषध घेण्याचा सल्ला दिला आहे. मिटकरी यांनी यासंदर्भात ट्विट करून टीका केली आहे. “पोंक्षे, म. फुलेंनी तुमच्या अनेक पिढ्यांचा उद्धार केलाय. फुले आणि बाबासाहेबांचा द्वेष करणारी तुमची हलकट प्रवृत्ती जाता जात नाही. आजारपणामुळे डोक्यावर परिणाम झाल्याचे जाणवते आहे. औषध वेळेवर घेत चला. वेळेवर दवापाणी नसलं की मेंदूवर परिणाम होतो,” असा उपरोधिक सल्ला मिटकरींनी पोंक्षे यांनी दिला आहे.
पोंक्षे, म. फुलेंनी तुमच्या अनेक पिढ्यांचा उद्धार केलाय. फुले आणि बाबासाहेबांचा द्वेष करणारी तुमची हलकट प्रवृत्ती जाता जात नाही. आजारपणामुळे डोक्यावर परिणाम झाल्याचे जाणवते आहे. औषध वेळेवर घेत चला. वेळेवर दवापाणी नसलं की मेंदूवर परिणाम होतो.
— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) March 1, 2020
तसेच पोंक्षेंच्या या वक्तव्यावर काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी मिश्कील शैलीत टीका केली आहे. अस्पृश्यता निवारणात सावरकरांचं योगदान फुले-आंबेडकरांपेक्षा श्रेष्ठ असणं असं म्हणणे म्हणजे अभिनयात अमिताभ बच्चन आणि दिलीप कुमार यांच्यापेक्षा शरद पोंक्षेंचं योगदान श्रेष्ठ म्हणण्यासारखं आहे.
काय म्हणाले होते शरद पोंक्षे
कार्यक्रमात बोलताना अभिनेते शरद पोंक्षे यांनी सावरकरांचं योगदान श्रेष्ठ असल्याचं म्हटलं. “अस्पृश्यता निवारणात सावरकरांचं मोठं योगदान आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्यापेक्षा सावरकरांचे योगदान श्रेष्ठ आहे. डॉ. आंबेडकर आणि महात्मा फुले हे त्या-त्या जातीत जन्माला आल्यानं त्यांना अपमानाचे चटके बसले. त्यामुळे विद्रोह करत प्रवाहाविरोधात लढले. मात्र अस्पृश्यतेचा कोणताही चटका बसला नसतानाही सावरकर ब्राह्मणाविरोधात उभे राहतात. समाजातील जातीच्या भिंती फोडण्यासाठी आयुष्य व्यतीत करतात. त्यामुळे दोन्ही राष्ट्रपुरुषांपेक्षा सावरकर श्रेष्ठ आहे,” असा दावा पोंक्षे यांनी केला होता.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

