टीम महाराष्ट्र देशा: भाजपच्या वाटेवर असणारे खा. उदयनराजे भोसले यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून केला जात आहे. यासाठी खा. अमोल कोल्हे यांनी त्यांची भेट घेत बंददाराआड चर्चा केली. जवळपास अर्धा तास चाललेल्या बैठकीनंतरही उदयनराजे यांची मनधरणी होऊ शकली नसल्याचं दिसत आहे.
मावळा छत्रपतींचं मन वळवू शकत नाही, अशी प्रतिक्रिया खासदार अमोल कोल्हे यांनी उदयनराजेंच्या भेटीनंतर दिली आहे. त्यामुळे कोल्हे हे उदयनराजेंची मनधरणी करण्यात अयशस्वी ठरल्याचं स्पष्ट होतं आहे. तर उदयनराजे भोसले हे भाजपात जाणार हेदेखील यावरुन आता स्पष्ट झाल आहे.
उदयनराजे भोसले हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत रविवारीच त्यांचा प्रवेश होणार असल्याचं बोलले जात होते. मात्र, काल सोलापूर येथील महाजनादेश मेळाव्यात त्यांचा प्रवेश झालेला नाही. आता राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून उदयनराजे याच्या मनधरणीचे प्रयत्न केले जात आहेत. मात्र, अमोल कोल्हे यांच्या भेटीनंतरही उदयनराजे हे भाजप प्रवेशावर ठाम असल्याचं दिसत आहे.
दरम्यान, आगामी राजकीय वाटचाली संदर्भातील निर्णय घेण्यासाठी काल उदयनराजेंनी समर्थकांची बैठक बोलवली होती. याविषयी बोलताना ”सहकाऱ्यांना तुम्ही विचार करुन निर्णय घ्या आणि मला सांगा असं मी सांगितलं आहे. गेली 25-30 वर्षे ज्या लोकांनी खऱ्या अर्थाने मला साथ दिली ते माझ्यासाठी महत्त्वाची आहेत, असं उदयनराजे म्हणाले आहेत.


