पिंपरी-चिंचवड : जनादेशाचा अपमान करून सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. आघाडी सरकारच्या बेफिकीरीमुळे राज्यात महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. असे म्हणत भारतीय जनता पार्टीतर्फे 25 फेब्रुवारी रोजी राज्यभरात तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची फक्त अल्प मुदतीची पीक कर्जमाफी करण्याची घोषणा केली आहे. शेतकऱ्यांची घोर फसवणूक करणाऱ्या व गेल्या महिन्याभरात राज्यातील महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यात अपयशी ठरलेल्या महाविकास आघाडी सरकारचा भाजपा तीव्र निषेध करण्यात आला.
राज्यभर भाजपचे आंदोलन सुरु असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी या आंदोलनावर टीका केली आहे. पाच वर्ष सरकारमध्ये असताना आपण काय काम केले, ते पाहावे म्हणजे त्यांना आंदोलन का करतोय याचा संभ्रम होईल, असा टोला त्यांनी लगावला. अमोल कोल्हे यांनी आज पिंपरी-चिंचवडमध्ये महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयाला भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते.
भाजपच्या या आंदोलनावर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी जोरदार टीका केली आहे. ‘माजी मुख्यमंत्री व गृहमंत्री,सध्याचे विरोधी पक्षनेते कदाचित आपला गजणी झालेला दिसतोय. आपल्याच काळात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये महाराष्ट्र देशात दुसरे, अशी ओळख निर्माण झाली. २०१६ ते २०१८ या काळात ३१,१२६ घटना घडल्या हे आपण विसरू नका. आजचे आंदोलन हे तुमच्या अपयशाचा आरसा आहे. चोराच्या उलट्या बोंबा. हे तंतोतंत आपण पालन करत आहात’. असा घणाघात चाकणकर यांनी केला आहे.


