🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : दुसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेताच मोदींनी पहिल्या कॅबिनेट बैठकीत शहिदांच्या मुला-मुलींसाठी मोठा निर्णय घेतला आहे. नक्षलवादी किंवा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलिसांच्या मुला-मुलींना दरमहिन्याला पंतप्रधान शिष्यवृत्ती योजनेतून शिष्यवृत्ती दिली जाणार असल्याचा निर्णय पंतप्रधान मोदींनी घेतला आहे.
काल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या केंद्रीय मंत्रीमंडळाचा शपथविधी झाला. आणि आज कोणाला कोणते मंत्रिपद देण्यात आले हेही जाहीर करण्यात आले आहे. याचदरम्यान, आज पंतप्रधान मोदींची पहिली कॅबिनेट बैठक पार पडली. त्या बैठकीत मोदींनी नक्षलवादी किंवा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलिसांच्या मुला-मुलींसाठी मोठा निर्णय घेतला.
विशेष म्हणजे, मोदींनी प्रचारादरम्यान मुंबईतल्या सभेत पोलिसांविषयी सहानुभूतीपूर्वक अनेक गोष्टी सांगितल्या होत्या. आतापर्यंत हजारो पोलिसांनी संरक्षण करताना स्वतःचं बलिदान दिलंय, पण त्यांच्या कुटुंबीयांकडे कुणीही पाहिलं नाही असे वक्तव्य केले होते.
आणि आता पहिल्याच बैठकीत त्यांनी तो निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे याआधी ही शिष्यवृत्ती फक्त सैन्यातील निवृत्त अधिकाऱ्यांच्या मुलांनाच मिळत होती. मात्र आता शहीद पोलिसांच्या मुलांनाही याचा फायदा होणार आहे.
काय आहे पंतप्रधान शिष्यवृत्ती योजना ?
राष्ट्रीय संरक्षण निधीतून माजी लष्करी अधिकाऱ्यांच्या मुलांना दरमहिन्याला उच्चशिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. या शिष्यवृत्तीच्या रकमेमध्येही आता वाढ करण्यात आली आहे. मुलांसाठी ही रक्कम २००० रुपयांवरुन २५००, तर मुलींसाठी २२५० रुपयांवरुन ३००० प्रति महिना एवढी करण्यात आली आहे. दरवर्षी शहीद पोलिसांच्या ५०० मुलांना योजनेचा लाभ होईल. प्रत्येक वर्षासाठी ५०० एवढी मर्यादा ठेवण्यात आली आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
