टीम महाराष्ट्र देशा – राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर ठाण्यात राहणाऱ्या एका सिव्हील इंजीनिअर तरुणाने गंभीर आरोप केला आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या सुरक्षारक्षकांनी बंगल्यावर नेवून त्यांच्यासमोर अमानुष मारहाण केल्याचा आरोप या तरुणाने केला आहे. या प्रकरणी ठाण्यातील वर्तकनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. याबाबतचे वृत्त न्यूज१८ लोकमत या वृत्तवाहिनीने दिलं आहे.
याबद्दल समजलेली अधिक माहिती अशी कि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजून ९ मिनिटांनी दिवे लावण्याचं आवाहन केलं होतं. मोदी यांनी हे आवाहन केल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या या भूमिकेवर टीका केली होती. आव्हाड यांनी आपली भूमिका ट्वीट करून प्रसिद्धही केली होती. त्याच्यानंतर सदर तरुणाने आव्हाड यांच्याबद्दल सोशल मीडियावर एक आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती.
या तरुणाने पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, ‘५ एप्रिलच्या रात्री ११:३० च्या सुमारास साध्यावेशात पोलीस त्याच्या घरी आले आणि ‘पोलीस स्टेशनला तुम्हाला बोलवलं आहे’ असं सांगून सोबत येण्यास सांगितलं. कशासाठी घेऊन जाताय असं विचारले असता त्यांनी कारण सांगितले नाही तसेच त्याच्या पत्नीला चौकशी करून १० मीनिटांमध्ये आणून सोडतो असं त्यांनी सांगितलं.
त्यानंतर या पोलिसांनी त्याला पांढऱ्या रंगाच्या स्क्रॉपिओ गाडीने नेलं. यावेळी त्यांनी तरूणाकडील मोबाईल फोन हिसकावून घेतला आणि जितेंद्र आव्हाड यांच्या विवियाना मॉल येथील नाथ बंगल्यावर नेलं असं त्याचं म्हणण आहे. या बंगल्यावर जितेंद्र आव्हाड सुद्धा हजर होते. तिथे आधीच उपस्थितीत असलेल्या १५ -२० जणांनी पोलिसांच्या फायबर काठीने तुटेपर्यंत पाठीवर, कंबरेवर, मांड्यावर मारहाण केली. काठी तुटली म्हणून त्यानंतर लाकडी काठी आणि लोखंडी पाईपने चक्कर येईपर्यंत बेदम मारहाण केली असा आरोप या तरुणाने केला आहे.
त्यानंतर आव्हाड यांनी पोस्ट का टाकली, असं विचारलं. यावेळी तरुणाने आपण अतिउत्साहात आणि भावनेच्या भरातही पोस्ट टाकली असं सांगत माफी मागितली. त्यानंतर आव्हाड यांनी एका कार्यकर्त्यांच्या मोबाईलवरून या तरुणाच्या घरी फोन करून त्याच्या पत्नीला ही पोस्ट काढण्यास सांगितले असे तरूण म्हणाला.
तसेच मला पुन्हा मारहाण करण्यात आली आणि ‘मी ही पोस्ट चुकून केली आहे. त्याबद्दल माफी मागतो,’ असा व्हिडिओ रेकॉर्ड करुन घेतला, असंही या तरुणाने सांगितलं. मारहाण झाल्यानंतर पोलिसांनीच मला रुग्णालयात नेलं आणि तिथे उपचार केल्यानंतर घरीही सोडलं असे तरुण म्हणाला.
या नंतर या तरुणाने वर्तकनगर पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार दिली. त्याच्या तक्रारीवरून वर्तकनगर पोलीस स्टेशनमध्ये अनोळखी व्यक्तींविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. तसंच, या तक्रारारदार तरुणावरही देखील आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी मागितला राजीनामा –
आता राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्री जितेंद्र आव्हाड याना मंत्रिमंडळातून तत्काळ बडतर्फ करावे अशी मागणी केली आहे. त्यांनी ट्वीटरवर ही मागणी केली आहे.
ते म्हणाले,’एखाद्या व्यक्तीला मंत्र्यांच्या सुरक्षारक्षकाने, मंत्र्यांच्या घरी नेऊन, मंत्र्यांच्या उपस्थितीत बेदम मारहाण करणे, ही अतिशय गंभीर घटना आहे. मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे यांनी मंत्री जितेंद्र आव्हाड याना मंत्रिमंडळातून तत्काळ बडतर्फ करावे.’
एखाद्या व्यक्तीला मंत्र्यांच्या सुरक्षारक्षकाने, मंत्र्यांच्या घरी नेऊन, मंत्र्यांच्या उपस्थितीत बेदम मारहाण करणे, ही अतिशय गंभीर घटना आहे.
मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे यांनी मंत्री जितेंद्र आव्हाड याना मंत्रिमंडळातून तत्काळ बडतर्फ करावे. @CMOMaharashtra— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) April 7, 2020
हेही पहा –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

