नवी दिल्ली: नाशिकमधून निघालेला शेतकरी, शेतमजूर, कष्टकऱ्यांचा लाँग मार्च आज पहाटेच्या सुमारास मुंबईतील आझाद मैदानावर दाखल झाला आहे. सामान्य मुंबईकर तसेच परीक्षार्थी विद्यार्थ्यांची गैरसोय होवू नये यासाठी पहाटेच लाँग मार्च आझाद मैदानावर आला.
या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपल्या पक्षाची बाजू मांडली. शिवसेना सत्तेत वाटेकरी असली तरी अधिकार आणि निर्णयाची सर्व खाती भाजपाकडे आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून कोणीही आमच्याकडे बोट दाखवू शकत नाही. आम्ही सत्तेत असूनही टेबल वाजवून सरकारविरोधात आवाज उठवतो. असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.
सरकारने अर्थसंकल्पात फसव्या घोषणा करुन कष्टकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळलं आहे. धुळ्याचे धर्माबाबा पाटील या शेतकऱ्याने मुंबईत मंत्रालयात आत्महत्या केली.आता जय किसानचा नारा देत हजारो जिवंत धर्मा पाटील मंत्रालयाच्या दिशेनं निघाले आहेत. आता त्यांचा आक्रोश आणि वेदना सरकारला बेचिराख केल्याशिवाय राहणार नाही, अशी मार्मिक टीका शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून करण्यात आली आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

