🕒 1 min read
सांगली : सांगली जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाल्यामुळे जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. महापूर ओसरू लागला असून, दर तासाला एक इंच पाणी पातळी कमी होत आहे. सांगलीत कृष्णा नदीची पाणी पातळी ५४ फूट ६ इंच इतकी आहे. अनेक उपनगरात अजूनही पाणी असलं, तरी विस्तारित भागात पाणी ओसरल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
रेल्वे मार्गावरील पुराचं पाणी ओसरल्यामुळे मिरज- पुणे, मिरज- बेळगांव रेल्वे मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. शनिवारपासून एक्सप्रेस, पॅसेंजर गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. मिरज- कोल्हापूर रेल्वे मार्गाखालील भराव वाहून गेल्यामुळे या मार्गावरील रेल्वे वाहतूक अद्याप पंधरा दिवस बंद ठेवण्यात येणार आहे तर आज पासून मिरज- सोलापूर रेल्वेमार्ग वाहतुकीसाठी खुला होणार आहे.
कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातल्या पूरस्थितीत सुधारणा होत असल्याचं, प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. पुराच्या पाण्याची पातळी हळूहळू कमी होत असल्याची माहिती कोल्हापूरचे पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी दिली आहे. कर्नाटकच्या अलमाट्टी धरणातून ५ लाख दशलक्ष घनमीटर प्रतिसेकंद या वेगानं पाण्याचा विसर्ग सुरु आहे आणि राधानगरी धरणाचे स्वयंचलित ४ दरवाजे खुले असल्याची अशी माहिती पाटबंधारे विभागानं दिली आहे.
कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातल्या पूरग्रस्त भागातून आतापर्यंत सव्वा चार लाखांहून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं असून, तीनशे सहा छावण्यांमधून पूरग्रस्तांची निवासाची सोय करण्यात आली आहे. या तात्पुरत्या निवाऱ्यांमधून नागरिकांना स्वच्छ पाणी, जेवणाची व्यवस्था आणि औषधोपचार उपलब्ध करून दिले जात आहेत. पूरग्रस्त भागात ३२५ वैद्यकीय पथकं कार्यरत असून आवश्यक औषधांसह आणि पाणी शुद्धीकरणासाठी क्लोरीनच्या एक कोटी गोळ्यांचं वाटप केलं जात आहे.
Ind vs WI : भारताचा आज वेस्ट इंडिजविरुद्ध दुसरा एकदिवसीय सामना
काहीजण सेल्फी काढत असतील तर परिस्थिती सुधारणार नाही : शरद पवार
पूरग्रस्तांच्या व्यथा जाणून घेणे म्हणजे राजकारण करणे नव्हे : शरद पवार


