टीम महाराष्ट्र देशा : पश्चिम महाराष्ट्रात पावसाने थैमान घातल्याने कोल्हापूर, सांगली, कराड आदी भागांत प्रचंड पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेकांचे संसार उद्धवस्त झाले आहेत. हजारो नागरिक बेघर झाले आहेत. अशा आपत्तीग्रस्त नागरिकांना मदत मिळावी, यासाठी प्रशासनाने अपत्तीग्रस्ताना १० किलो तांदूळ, १० किलो गहू देण्याची घोषणा केली आहे. मात्र विदारक परिस्थितीत देखील भाजप सरकार जाहिरातबाजी करताना दिसत आहे. पूर ग्रस्तांना देण्यात येणाऱ्या अन्न धान्यांच्या पाकिटांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो लावण्यात आला आहे.
सरकारच्या या संधिसाधू प्रवृत्तीला विरोधकांनी लक्ष्य केले आहे. तर हे सरकार केवळ जाहिरातबाजीच्या कामाचे असल्याची टीका अनेक नेत्यांनी केली आहे. सरकारकडून देण्यात येणाऱ्या या गहू आणि तांदुळाच्या पॅकींगवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार सुरेश हाळवणकर यांचे फोटो असलेले स्टीकर छापण्यात येत आहेत. तसेच, स्थानिक पुढारी समिर शिंगटे आणि सुधाकर भोसले यांचीही नावे टाकून जाहिरातबाजी करण्यात आली आहे. सरकारच्या या जाहिरातबाजीचा सामान्य नागरिकांनी देखील निषेध करत तीव्र संताप व्यक्त केला आहे.
दरम्यान या जल आपत्तीमुळे सरकार वारंवार चांगलेचं अडचणीत आले आहे. राज्य सरकारने पुरात अडकलेल्या लोकांसाठी अजब निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार पुराचं पाणी २ दिवस घरात असेल तरच गहू आणि तांदूळ मिळणार असल्याचा अजब निर्णय घेतला आहे. त्यामुळे जनसामान्यांमध्ये या निर्णयामुळे नाराजी पसरली आहे. त्यामुळे सरकारच्या या निर्णयावर जोरदार टीका होताना दिसत आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

