🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पुत्रप्रेमापोटी वेगळी राजकीय वाट धरणारे राज्याचे माजी विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील हे यु-टर्न घेऊन पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची बातमी एका वृत्तपत्राने दिली होती. याबाबत अधिवेशनकाळात नागपूरमध्ये काँग्रेस सरचिटणीस व महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे व विखे पाटील यांची एका पंचतारांकित हॉटेलमध्ये बंद दाराआड चर्चा झाली असल्याची देखील बातमी आली होती.
मात्र, मल्लिकार्जुन खर्गे यांनी या सगळ्या चर्चांना ब्रेक लावला आहे. मला कोणीही भेटलेलं नाही. माझी कुणाशी चर्चा झाली नाही. मला याबाबत काही माहिती नाही. अस स्पष्टीकरण खर्गे यांनी दिले आहे.
मात्र, ‘काही नेते पुन्हा काँग्रेस येऊ पाहत आहेत. त्यांचं स्वागत करायला हवं,’ अशी प्रतिक्रिया कॉंग्रेस नेते अमित देशमुख यांनी दिली आहे. त्यामुळे विखे पाटील हे खरोखरच पुन्हा काँग्रेसमध्ये येण्यासाठी हालचाली करत असल्याच्या चर्चेला आणखीनच जोर मिळाला आहे. मात्र राधाकृष्ण विखे पाटील यांनी मात्र याबाबत अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही.
राधाकृष्ण विखे यांचे पुत्र डॉ. सुजय विखे हे नगरमधून लोकसभेसाठी इच्छूक होते. मात्र काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागावाटपात ही जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला गेल्याने सुजय यांनी काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी विरोधी पक्षनेतेपदी असलेल्या राधाकृष्ण विखे यांनी केवळ आपल्या पदाचा राजीनामा देत पक्षातच राहणे पसंत केले. त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर संधी साधत विखेंनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपच्या तिकिटावर ते विधानसभा निवडणुकीत जिंकूनही आलेत. मात्र भाजपला राज्यात सत्तेने हुलकावणी दिल्याने विखे अस्वस्थ असून त्याच अस्वस्थतेतून त्यांची पावले पुन्हा काँग्रेसकडे वळू लागली असून राधाकृष्ण विखे यांनी नागपूर मुक्कामी असताना मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतल्याचे वृत्त ‘कट्टान्यूज’ने दिले होते.


