🕒 1 min read
मुंबई : स्वरसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar)यांचे ६ फेब्रुवारी रोजी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झाले. यानंतर भाजप आमदार राम कदम(Ram Kadam) यांनी लता मंगेशकर यांचे स्मारक उभारावे अशी मागणी केली. यावरून राज्यात राजकीय वाद पेटलेला दिसून येत आहे. असे असतांनाच आता शिवसेना खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांनी आजच्या सामना रोखठोकच्या माध्यमातून या मुद्द्यावर भाष्य केले आहे. तसेच सुरांच्या अप्सरेला वेगळ्या स्मारकाची गरज काय?, असा सवालही राऊतांनी केला आहे.
लेखात राऊत म्हणाले आहेत की, ‘लता मंगेशकरांचे मोठेपण सांगण्याची गरज राहिलेली नाही. ते स्वयंसिद्ध आहे. चांदण्यासारखे ते सुरांतून अखंड झिरपत राहिले आहे. सध्याचे युग ग्रामोफोनचे आणि कॅसेटचे नाही. जग पुढे गेले आहे. कोणत्याही यंत्राच्या मदतीशिवाय त्यांचे सूर सतत कानी पडत आहेत. प. बंगालात पुढचे पंधरा दिवस सार्वजनिक ठिकाणी लतादीदींची गाणी वाजविली जातील, हा ममता सरकारचा निर्णय आहे. अशा सुरांना, सुरांच्या अप्सरेला वेगळ्या स्मारकाची गरज काय? मीराबाईंची भजने आणि पदे अनेकांनी गायली. ‘म्हारो रे गिरीधर गोपाल’ हे कुमार गंधर्वांपासून लता मंगेशकरांपर्यंत सगळ्यांनी गायले. परंतु गायकीच्या अंगाने गायलेल्या मीराबाईंच्या भजनांच्या तुलनेत लतादीदींनी भावाच्या अंगाने गायलेली तीच भजने मन हेलावून टाकतात. लतादीदींनी जणू आपले सारे जीवनच व्यापून टाकले. ‘
दरम्यान, गीतेच्या अध्यायापासून ज्ञानेश्वरांच्या पसायदानापर्यंत सर्वकाही आपण लताबाईंच्या आवाजातच ऐकत राहिलो. हा सारा त्यांच्या कलाजीवनातील भव्यदिव्य अशा ऐश्वर्याचा भाग आहे. हे ऐश्वर्य अपार कष्टाच्या आणि प्रदीर्घ परिश्रमाच्या पायावर उभे राहिले. म्हणून त्यांनी सदैव ऋण मानले ते पित्याचे. १९४२ मध्ये वयाच्या फक्त ४२ व्या वर्षी निष्कांचन अवस्थेत निधन पावलेल्या मराठी रंगभूमीवरील एका तपस्वी कलावंताच्या तंबोऱ्याला दीनानाथांनी ‘साधुपुरुष’ म्हटले आणि तो तंबोरा आपल्या लेकीसाठी ठेवून ते गेले. मुलीने निष्ठा आणि तपश्चर्या याचे परिपूर्ण योगदान या तंबोऱयास दिले. पिता निष्कांचन अवस्थेत गेला, पण त्याची लेक वैभवाच्या शिखरावर गेली. तिने यशाच्या सर्व पायऱ्या सर केल्या. लता मंगेशकर ही सुवर्ण मोहोरांच्या सुरांची खाण शेवटपर्यंत भरलेली राहिली. ते वैभव देशाने शिवतीर्थावर पाहिले तेव्हा पित्याचा म्हणजे दीनानाथांचा आत्माही प्रसन्न झाला असेल, असेही राऊत म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- “पूर्वी बाळासाहेबांच्या आणि आता लतादीदींच्या स्मारकावरून वाद करणे हे रोगट मानसिकतेचे लक्षण”
- सर्वसामान्यांच्या स्वप्नांना गती देणारा द्रष्टा उद्योगपती काळाच्या पडद्याआड! – नाना पटोले
- IPL AUCTION 2022: हर्षल पटेलची जादू पुन्हा बँगलोरसोबत चालणार
- बाबासाहेबांच्या मूळ गाव आंबडवेतील स्मारक तीर्थस्थळ म्हणून घोषित करावे – राष्ट्रपती
- “१० मार्चनंतर महाराष्ट्रात सरकार बदलेल” – चंद्रकांत पाटलांची पुनरावृत्ती


