🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा- विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडेंवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विश्वासदर्शक ठराव मांडून तो आवाजी मतदानाने मंजूर करून घेतल्याने विरोधकांचा तिळपापड झाला आहे. बागडे यांच्यावर विश्वासदर्शक ठराव मांडणे हा सरकारची ठरवून केलेली कृती होती. बहुमताच्या जोरावर भाजपा आणि शिवसेनेने विरोधकांना दाबण्याचे काम केले आहे. सरकारने पळपुटेपणा दाखवल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनी केला.
शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनीही त्या ठरावाला अनुमोदन दिले, हे अन्यायकारक आहे. आम्हाला यावर चर्चा करायची होती मात्र तालिका अध्यक्षांनी सभागृह १५ मिनिटांसाठी तहकूब केले. सरकारने हे कृत्य करून पळपुटेपणा आहे. @NCPspeaks #BudgetSession2018
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) March 23, 2018
महाराष्ट्राच्या विधीमंडळात आज नाट्यमय घडामोडी घडल्या. विरोध पक्षांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याविरोधात अविश्वास ठराव मांडला होता. अविश्वास ठरावावर चर्चा होण्यापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अचानक विधानसभा अध्यक्षांवर विश्वासदर्शक ठराव मांडला. हा ठराव आवाजी मतदानाने मंजूर झाला. या ठरावाला शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी अनुमोदन दिले.
विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे हे विधानसभेचे अध्यक्ष असतानाही एखाद्या पक्षाच्या अध्यक्षाप्रमाणे वागत असून मनमानीपणे कामकाज रेटत आहेत. विरोधकांचा आवाज दाबून सदस्यांमध्ये भेदभाव करण्याचा प्रयत्नही करत आहेत, आदी कारणे देत विरोधकांनी बागडे यांच्या विरोधात अविश्वास ठरावाची नोटीस दिली होती. विधानसभा नियमानुसार येत्या दोन आठवड्यात अध्यक्षांचा अविश्वास प्रस्ताव सभागृहात चर्चेसाठी येईल. मात्र तत्पूर्वी अध्यक्षांनी नैतिकता दाखवून सभागृहात कामकाज करू नये. त्यांच्याजागी तालिका अध्यक्ष कामकाज करू शकतात. याबाबत बागडे यांनी सदसद्विवेकबुद्धीने निर्णय घ्यावा, असं राष्ट्रवादीचे नेते अजित पवार म्हणाले होते.

