पंढरपूर – गेल्या काही महिन्यात पुन्हा एकदा कोरोना संसर्गाने डोकं वर काढले आणि त्यातच पेट्रोल, डिझेल सोबतच घरगुती गॅस, डाळी, खाद्यपदार्थांच्या किंमतींचे दरही आस्मानाला भिडले आहेत. यामुळे सामान्य माणूस त्रस्त झाला असून घर चालवायचे कसे? असा प्रश्न त्यांच्यापुढे उपस्थित होत आहे. त्यातच शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नसताना आता खासगी रासायनिक खतांच्या किंमतीमध्येही सरासरी ६०० ते ७०० रूपये एवढी विक्रमी दरवाढ केली होती.
यामुळे विरोधकांनी केंद्र सरकारसह पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला होता. यासोबतच, भाजप मधील विविध नेत्यांनी देखील खत दरवाढ रद्द करावी अशी मागणी केली होती. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरद्वारे खतांच्या दरात कपात केल्याचं जाहीर केलं आहे. विशेष म्हणजे, आंतरराष्ट्रीय बाजारात दरवाढ झाल्यानंतरही खताची किंमत अर्ध्याने कमी केली आहे.
दरम्यान, या निर्णयांनंतर स्वाभिमानी शेतकरी संघटना युवा आघाडीचे नेते रणजित बागल यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. केंद्र सरकारने रासायनिक खतांची केलेली दरवाढ मागे घेतली, हा शेतकऱ्यांच्या एकजुटीचा हा मोठा विजय असल्याचे त्यांनी म्हटले आहे सरकारने शेतकऱ्यांना इथुन पुढे तरी गृहीत धरून निर्णय घेणे बंद करावे अन्यथा नंतर माघार घेवुन तोंडघशी पडावे लागते. खतदारवाढीच्या आंदोलनाच्या माध्यमातुन महाराष्ट्रातील व देशातील सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या तयार झालेल्या अभूतपूर्व वज्रमूठीने खऱ्या अर्थाने या व्यवस्थेविरोधात शेतकऱ्यांचा दबावगट निर्माण होण्यास मदत होणार आहे असा विश्वास व्यक्त केला आहे.
दरम्यान, दुसरीकडे रयत क्रांती संघटनेने मोदींच्या या निर्णयाबाबत समाधान व्यक्त केले आहे. रयत क्रांती संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे म्हणाले, केंद्र सरकारने रासायनिक खतांच्या किंमती स्थिर ठेवून देशातील शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. खरीब हंगामाच्या तोंडावर रासायनिक खताच्या किमती कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात वाढ केल्यामुळे समस्त देशातील शेतकरी चिंतेत होता, कारण पेरणी कशी करायची एकीकडे कोरोना महामारीमुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे दुसरीकडे खत दरवाढ अशा दुहेरी संकटात सापडला होता.
रयत क्रांती संघटनेचे नेते आ. सदाभाऊ खोत यांच्यामार्फत आम्ही केंद्रीय मंत्र्याच्या संपर्कात राहून हा विषय केंद्र सरकारच्या निदर्शनास आणून दिला.यात आम्ही केंद्रीय मंत्र्यांना सांगितलं की कंपन्यांनी जरी ही दरवाढ केली असली तरी ही दरवाढ शेतकऱ्यांना परवडणारी नाही आपण यात हस्तक्षेप करून तात्काळ निर्णय घ्यावा व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. आमची विनंती मान्य करून केंद्र सरकारने ही दरवाढ मागे घेत असताना डीएपी खतांवरील अनुदान १४० % वाढ केली आहे व यासाठी १४,७७५ कोटी रुपयांची सबसिडी देणार आहे. केंद्र सरकारने हा निर्णय घेतल्यामुळे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे आम्ही देशातील सर्व शेतकऱ्यांच्या व संघटनेच्या वतीने जाहीर आभार व्यक्त करतो असे ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- केंद्र सरकारने खतांच्या किंमती स्थिर ठेवून देशातील शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला – रयत
- ‘महा विकास आघाडी कोकणातल्या शेतकरी बांधव व नागरिकांच्या सोबत खंबीरपणे उभी आहे’
- कोरोना संसर्ग रोखण्यासाठी अहमदनगर जिल्ह्याने राबविलेल्या उपाययोजनांची नरेंद्र मोदींनीही घेतली दखल
- ‘भारताला कोरोना व्हायरसशी लढत असताना काँग्रेस नामक व्हायरसशी सुद्धा लढावं लागत आहे’
- राजीव यांच्या निधनाने आमच्या परिवारातील एक सदस्य गेल्याचे दुःख आहे – प्रियांका गांधी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
