औरंगाबाद : कोरोना संसर्गाच्या दुसर्या लाटेत गंभीर रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे या लाटेत मृत्युदराचे प्रमाणही अधिक दिसून येत आहे. मागील पंधरा दिवसांतच जिल्ह्यात एकूण ३९२ बाधितांचा मृत्यू झाला आहे. यात शहरातील मृतांचे प्रमाण कमी असून ग्रामीण भागातील मृतांची संख्या ही अधिक आहे. त्यामुळे मृत्युदरास रोखण्याचे मोठे आव्हान आरोग्य यंत्रणेसमोर आहे.
कोरोनाच्या दुसर्या लाटेने देशभरात थैमान घातले आहे. मागील २४ तासांतच देशभरात चार हजारांपेक्षा अधिक कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. कोरोनाच्या दुसर्या लाटेतच वाढत्या रुग्णसंख्येमुळे देशभरात सरकारी आरोग्य यंत्रणेची दमछाक झाली आहे. याच पार्श्वभूमीवर आता कोरोनाची जुलैनंतर येणारी तिसरी लाट अधिकच घातक असल्याचे भाकीत आरोग्य तज्ज्ञांनी केले आहे. त्यामुळे या दुसर्या लाटेत कोरोनाच्या मृत्युदराचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे क्रमप्राप्त झाले आहे. मात्र औरंगाबाद जिल्ह्यात मागील तीन महिन्यांपासून कोरोनाग्रस्तांचे होणारे मृत्यू ही चिंताजनक बाब बनली आहे.
फेब्रुवारी महिन्यात दुसर्या लाटेने शिरकाव केला. पुढे मार्च व एप्रिलमध्ये या लाटेने रौद्र रूप धारण केले होते. मात्र प्रशासकीय यंत्रणेनेच्या प्रभावी उपाययोजनांमुळे मे महिन्याच्या सुरूवातीपासून आजपर्यंत मागील पंधरा दिवसांत रोजचा बाधितांचा आकडा कमी होताना दिसत आहे. मात्र यात मृत्युदराचे प्रमाण हे कायम असून त्यास रोखण्याचे आव्हान आरोग्य यंत्रणेसमोर उभे आहे. १ ते १५ मे दरम्यानच्या पंधरा दिवसांतच जिल्ह्यात तब्बल ३९२ जणांचा मृत्यू झाला आहे. यात शहरातील १३४ मृतांचा समावेश असून ग्रामीण भागातील ३५८ बाधितांचा मृत्यू झाला आहे.
कोरोनाची दुसरी लाट जिल्ह्यात सुरू झाल्यानंतर मार्च महिन्यात ४०२ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. एप्रिल महिन्यात मृत्यूचे हे प्रमाण यापेक्षा दुप्पट आढळले. एप्रिलमध्ये ३० दिवसांत ८४२ बाधितांचा मृत्यू झाला. एप्रिलप्रमाणेच आता मे महिन्यातही रुग्णसंख्या कमी होत असली तरी मृत्युचे प्रमाण कायम असून पंधरा दिवसांतच ३९२ जणांचा मृत्यू झालेला आहे.
महत्वाच्या बातम्या
- मदत कार्य वेगाने सुरु ठेवा ; मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश
- ‘मी गोमूत्र पिते, त्यामुळेच मला कोरोना झाला नाही’, भाजप खा.साध्वी प्रज्ञा सिंह यांचा दावा
- पुणेकरांनी करून दाखवलं ! नव्या कोरोनाबाधितांची संख्या तीन अंकी
- राजीव खंडेलवालने गोव्यात तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाचे फोटो शेअर करत दिला आधार
- बंगाल में बवाल! ममता समर्थकांची सीबीआय कार्यालयावर दगडफेक

