मुंबई : गावदेवी पोलीस ठाणे हद्दीतील पबमध्ये मारहाणप्रकरणी सात जणांविरोधात पोलिसांनी नुकतेच आरोपपत्र दाखल केले आहे. या प्रकरणात माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी आपल्यावर दबाव टाकून एकाचे नाव आरोपीच्या यादीतून काढण्यास सांगितल्याचा आरोप पोलीस निरीक्षक अनुप डांगे यांनी केला होता. यावरूनच डांगे यांनी परमबीर सिंह यांच्याविरोधात पोलीस महासंचालक आणि मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती. याप्रकरणी गृह विभागाने नुकतेच चौकशीचे आदेश दिले आहेत.
२३ नोव्हेंबर २०१९ रोजी गावदेवी येथील डर्टी बन्स पब रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याने तो बंद करण्यासाठी गावदेवी पोलीस तिथे गेले होते. त्यावेळी दोन गटांमध्ये सुरू असलेल्या मारहाणप्रकरणी प्रसिद्ध हिरे व्यापारी व निर्माता भरत शहाचा नातू यश, त्याचे दोन मित्र व तीन विरोधकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावेळी कारवाईसाठी गेलेले पोलीस नाईक संतोष पवार यांना मारहाण झाली होती. त्यात पवार यांचा गणवेश फाटला होता. त्यानंतर इतर पोलिसांनी मध्यस्थी करून पवार यांची सुटका केली व यश व त्याच्या काही मित्रांना घेऊन पोलीस ठाण्यात आणले.
या प्रकरणात जितू नवलानीचे नाव आरोपी म्हणून घेण्यात आले होते. या घटनेनंतर तत्कालीन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस महासंचालक असलेल्या परमबीर सिंह यांनी याबाबत कोणताही संबंध नसताना त्यांना एसीबी कार्यालयात बोलावल्याचा आरोप डांगे यांनी लेखी तक्रारीत केला आहे.
तत्कालीन पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी तेथे जाण्याची परवानगी दिली नाही. त्यानंतर फेब्रुवारी २०२० मध्ये परमबीर सिंह मुंबई पोलीस आयुक्त झाल्यानंतर त्यांनी जितू नवलानीच्या सांगण्यावरून डांगे यांना नियंत्रण कक्षात बदली केल्याचा आरोप पत्रात केला होता. त्यावेळी डांगे यांनी गावदेवी अधिकाऱ्यांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर यासंदर्भात टाकलेल्या एका संदेशाची गंभीर दखल घेत अखेर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. डांगे यांनी फेब्रुवारीत गृह विभागाला पत्र लिहून याप्रकरणी चौकशीची मागणी केली होती.
त्यांनी परमबीर सिंहांचे पब मालकाशी असलेले संबंध व त्यांच्यावर टाकण्यात आलेल्या दबावप्रकरणी, तसेच भ्रष्टाचारप्रकरणी चौकशीची मागणी केली होती. तक्रारीनंतर हे प्रकरण महासंचालक संजय पांडे यांच्याकडे चौकशीसाठी सुपूर्द करण्यात आले होते. पण त्यांनी याबाबत चौकशीला नकार दिल्यानंतर आता एका समितीमार्फत या प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘पुण्यात कोरोनाची लाट ओसरल्याचे चित्र असले, तरी आपण आता गाफील राहणार नाही’
- ‘शिवसेना पक्षप्रमुख आघाडीत गेल्यावर कसे बदलले, हे आता जनतेला माहीत झालं आहे’
- ‘राज्यपालांना केवळ एक निवेदन देऊन मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाबाबत पुन्हा जबाबदारी टाळली’
- ऑक्सिजन एक्स्प्रेस पुण्यातील लोणीत दाखल; ३७ तासांत कापले १ हजार ७२५ किमी अंतर
- सोनू सूदने पंतप्रधान व्हावे, यावर उत्तर देत त्याने पुन्हा एकदा जिंकली लोकांची मनं…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

