मुंबई : कोरोनाने पुन्हा एकदा राज्यासह देशभरात थैमान घातले आहे. रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने आरोग्य व्यवस्था अपुऱ्या पडत आहेत. बेड्स, ऑक्सिजन, व्हेंटीलेटर्स, रेमडेसिवीर इंजेक्शन आदींचा तुटवडा असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
यामुळे कोरोना संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात कडक निर्बंध लागू केले आहेत. १४ एप्रिल रात्री आठ वाजल्यापासून ते १ मे सकाळी ७ वाजेपर्यंत १४४ कलम म्हणजेच संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यात अत्यावश्यक सेवा व अतिमहत्त्वाचे कारण वगळता नागरिकांनी बाहेर पडू नये असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं होतं. मात्र, नागरिकांची वर्दळ अद्यापही कमी झाल्याचे दिसून येत नाहीये. यामुळे ज्या व्यापाऱ्यांना दुकाने बंद ठवावे लागत आहे, त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून टास्क फोर्स ने देखील हे नियम परिणामकारक नसून कठोर नियमांची गरज असल्याचं मत व्यक्त केलं आहे.
कठोर निर्बंध लावण्याची मागणी अनेक मंत्री देखील करत असून अत्यावश्यक दुकानांना (मेडिकल वगळता) केवळ सकाळी ७ ते ११ यावेळेतच परवानगी देण्यात येण्याची शक्यता आहे. याबाबत, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील उद्धव ठाकरेंशी चर्चा केली असून आज दुपारी ३.३० वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार असून यानंतर कडक निर्बंधांची घोषणा करण्यात येण्याची शक्यता आहे.
राज्यात सध्या लागू असलेल्या निर्बंधांमुळे उपमुख्यमंत्री अजित पवार नाराज असल्याचं वृत्त एका वृत्तवाहिनीनं सूत्रांच्या हवाल्यानं दिलं आहे. राज्यात संचारबंदी लागू आहे. मात्र तरीही लोकांकडून निर्बंधांचं उल्लंघन सुरू आहे. कोरोनाचे रुग्ण वाढतच आहे. त्यामुळे अजित पवार सध्या लागू असलेल्या निर्बंधांवर नाराज असल्याचं समजतं. त्यांनी आपली नाराजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे बोलून दाखवली आहे. आज होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अजित पवार याबद्दल त्यांची भूमिका मांडतील अशी शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या
- देशात १ मे पासून १८ वर्षांवरील नागरिकांना मिळणार लस
- ‘ऑक्सिजन एक्सप्रेस’मुळे जाग्या झाल्या ‘वॉटर एक्सप्रेस’च्या आठवणी
- ‘मला कोणीही ‘अनफिट’ म्हटलेले मला आवडत नाही’
- लॉकडाऊनचा निर्णय जाहीर होणार? मंत्रिमंडळाची आज महत्वाची बैठक
- कोरोना स्प्रेडर! जालना शहरात मोकाट फिरणाऱ्यांची कोरोना चाचणी, चौघांचा अहवाल पाॅझिटिव्ह


