🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा: “राजा हा राजाच्या पोटी नव्हे तर मतपेटीतून जन्माला यावा”असं भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटलंय.पण आज राज्यात वरळी पासून ते परळी पर्यंत घराणेशाहीने लोकशाहीला सुरुंग लावल्याचं दिसतं आहे.देशातील सर्वच पक्ष घराणेशाहीला आमचा विरोध आहे असे सांगतात,परंतु प्रत्यक्षात मात्र परिस्थिती उलट असल्याचं दिसून येत.नुकताच उद्धव ठाकरे यांच्या मंत्री मंडळाचा विस्तार झाला आणि यात सुद्दा मोठ्या प्रमाणावर घराणेशाहीतून आलेले अनेक लोकं बघायला मिळाले.ठाकरे सरकारचे मंत्रिमंडळच पाहता.एकूणच मंत्र्याच्या संख्येत तब्बल ५० टक्के मंत्री घराणेशाहीतून आलेले आहेत.मंत्रिमंडळ विस्तारात एकूण ४३ पैकी २२ मंत्री हे घराणेशाहीची पार्श्वभूमी असलेले आहेत.या मंत्रिमंडळात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ९,कॉंग्रेसचे ८ आणि शिवसेना व पुरस्कृत ५ घराणेशाहीतले आहेत. एकूणच ५० टक्के मंत्री हे घराणेशाहीतून आलेले आहे.१५ पैकी ९ म्हणजे राष्ट्रवादीचे ६० टक्के मंत्री घराणेशाहीचे तर कॉंग्रेस चेही ६० टक्के मंत्री घराणेशाहीचे आहेत.
आमदारकीची तिकीटेही अशा लोकांनाच द्यायचे जे निवडून येतील आणि निवडून आल्यावर मंत्रीही हेच होणार.ही जणू परंपराच निर्माण झाली आहे.महाराष्ट्रातील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व सर्व पक्षाचे प्रमुख नेते हेच घराणेशाहीतून आल्यामुळे या विषयावर कोणताच पक्ष बोलणार नाही हे नक्की.आता तुम्हीच पहा या मंत्रिमंडळात कोण-कोण आलेले आहे या घराणेशाहीतून….
१)आपल्या राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र आहेत.आतापर्यंत सत्तेचा रीमोट हातात ठेवणारे ठाकरे यावेळी खुद्द सहभागी झालेले आहेत.
२)ज्याचे उपमुख्यमंत्री अजित अनंतराव पवार यांना ८० तासाच्या सरकार नंतर विसरणं हे महाराष्ट्राला आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी अवघड आहे.राजकारणातील चाणक्य माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचे ते पुतणे तर बहिण सुप्रिया सुळे या खासदार आहेत आणि त्यांचे पुतणे रोहित पवार हे कर्जत – जामखेडचे आमदार आहेत.मध्यंतरी त्यांचे पुत्र पार्थ पवार यांनी मावळ लोकसभा मतदारसंघातून श्रीरंग बारणे यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती.पण ते पराभूत झाले.
३)इस्लामपूरचे आमदार जयंत पाटील हे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत.महाविकास आघाडी स्थापन करण्यात यांचा सिंहाचा वाटा होता.यांचे वडील सहकारमहर्षी राजारामबापू पाटील हे देखील मंत्री होते.
४)सहकार क्षेत्रातले नगर जिल्ह्यातील जोरात असणारे व्यक्तिमत्व बाळासाहेब थोरात राज्याचे महसूल मंत्री आणि कॉंग्रेसचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष आहेत.त्यांचे वडील भाऊसाहेब संतूजी थोरात हे आमदार होते.
५)राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मंत्री आणि सात वेळा आमदार असणारे आंबेगाव मतदार संघातून निवडून आलेले आमदार दिलीप वळसे पाटील यांचे वडील दत्तात्रय वळसे हे सुद्धा आमदार होते.
६)राज्याचे माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे धनंजय मुंडे यांचे वडील पंडितअण्णा मुंडे बीड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते.आणि बहिण पंकजा मुंडे या गेल्या सरकारमध्ये ग्रामविकासमंत्री होत्या.तर प्रीतम मुंडे ह्या बीडच्या विद्यमान खासदार आहेत.
७)प्राजक्त तनपुरे नगर जिल्ह्यातील राहुरी मतदार संघाचे आमदार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांचे ते भाचे आहेत. तर प्राजक्त तनपुरे यांचे वडील प्रसाद तनपुरे हे देखील आमदार होते.
८)अशोक चव्हाण हे राज्याचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे पुत्र आहेत.अशोक चव्हाण हे स्वतः देखील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत.आदर्श घोटाळ्यात नाव आल्यानंतर त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
९)माजी मुख्यमंत्री विलासराव देखमुख यांचे पुत्र अमित देशमुख यांनी सुद्धा मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.ते लातूर शहर चे आमदार आहेत तर अमित देशमुखांचे लहान बंधू धीरज देशमुख हे लातूर ग्रामीणचे आमदार आहेत.
१०)कॉंग्रेसचा युवा चेहरा असलेले विश्वजीत कदम यांचे वडील पंतगराव कदम हे सुद्धा महाराष्ट्राचे मंत्री राहिलेले आहेत.
११)मराठवाड्यातील मोठ नाव आणि माजी खासदार अंकुशराव टोपे यांचे पुत्र राजेश टोपे यांनी पुन्हा एकदा मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.२००९ ते २०१४ या आघाडी सरकारच्या काळात राजेश टोपे यांनी मंत्रिपद भूषवलेले आहे.
१२)बाळासाहेब पाटील यांचे वडील पी.डी. पाटीलही आमदार होते.कराड मध्ये पी.डी. पाटील याचं मोठ वर्चस्व होत.
१३)बुलढाण्याचे राजेंद्र शिंगणे यांनी देखील मंत्रीपदाची शपथ घेतलीय त्यांचे वडील भास्करराव शिंगणे हे सुद्धा आमदार होते.
१४)राष्ट्रवादीने दिलेल्या मंत्रीपदातील एकमेव महिला आमदार आदिती तटकरे या माजी मंत्री आणि रायगडचे विद्यमान सदार सुनिल तटकरे यांच्या कन्या आहेत.
१५)नागपूर जिल्ह्यात सहकाराची मुहुर्तमेढ रोवणारे माजी मंत्री व सहकार महर्षी बाबासाहेब केदार यांचे पुत्र सुनील केदार यांनी सुद्धा मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
१६)अमरावती जिल्ह्यातील अग्रणी नेतृत्व आणि माजी आमदार भैय्यासाहेब ठाकूर यांच्या कन्या यशोमती ठाकूर या सुद्धा ठाकरे सरकारमध्ये मंत्री असणार आहेत.
१७)२००९ ते २०१४ आघाडी सरकारमधील महिला आणि बालविकास मंत्री वर्षा गायकवाड या सुधा आता पुन्हा मंत्री असणारेत त्यांचे वडील एकनाथ गायकवाड हे खासदार आहेत.
१८)कोल्हापूर मधील मोठ प्रस्थ म्हणजे बंटी पाटील.बंटी पाटील यांचे वडील डी.वाय.पाटील हे मंत्री आणि राज्यपाल होते.
१९)नेवासा तालुक्यातील पाणीदार आमदार शंकरराव गडाख यांना शिवसेनेच्या कोट्यातून मंत्रिपद मिळाले आहे. त्यांचे वडील जेष्ठ साहित्यिक यशवंतराव गडाख हे खासदार होते.
२०)माजी मंत्री बाळासाहेब देसाई यांचे नातू आणि पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांची देखील मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे.
२१)राजेंद्र पाटील यड्रावकर या अपक्ष आमदाराला शिवसेनेने मंत्रिपद दिले आहे त्यांचे वडील सूतगिरणी चेअरमन होते.
२२)अखेर नाव येत ते वरळी मतदार संघाचे आमदार आणि युवसेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे. आदित्य ठाकरेंचे वडील राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे हे बाप-लेकाच सरकार असल्याची टीका देखील होत आहे.
आता घराणेशाहीचा विषय काढला तर हे नेते आणि मंत्री किती कार्यक्षम आहेत याचे पाढेच वाचले जातील.पण वास्तविक पाहता नेत्यासाठी घरदारावर तुळशीपत्र ठेवणाऱ्या कार्यकर्त्यांच्या नशिबी सतरंज्या उचलणेच असल्याच दिसतंय.आता लोकहो सरकारमध्ये बाप लेख पुतण्या भाचा असचं मंत्रीमंडळ पाहायला तयार राहा.त्यामुळे लेखणीला तूर्त विराम देऊया.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

