उस्मानाबाद : जिल्ह्यातील ६२२ ग्रामपंचायतच्या सरपंच पदाचे आरक्षण सोडत काढून जाहीर करण्यात आले आहे. यात जिल्ह्यातील ४५५ ग्रामपंचायतीचे आरक्षण राखीव प्रवर्गासाठी तर खुल्या प्रवर्गासाठी केवळ १६७ ग्रापंचे आरक्षण जाहीर करण्यात आले. विशेषत: महिलांसाठी ३२० ग्रामपंचायतीचे आरक्षण सुटले आहे. आरक्षणामुळे अनेक इच्छुकांना सरपंच पदाने हुलकावणी दिली. तर काही ठिकाणी बहुमत असताना देखील सरपंचपदाची माळ विरोधी गटाच्या गळ्यात पडणार असल्याचे स्पष्ट झाले.
जिल्ह्यातील ४२८ ग्रामपंचायतच्या निवडणुकीनंतर सरपंच पदासाठी इच्छुक असलेल्या अनेकांनी आरक्षण जाहीर होण्यापूर्वीच जोरदार मोर्चेबांधणी सुरू केल्याचे चित्र गावोगावी दिसत होते. ग्रापं निवडणुकीत गावस्तरावर विविध राजकीय पक्ष व स्थानिक पुढाऱ्यांनी आघाड्या करून निवडणूका लढविल्या होत्या. त्यामुळे स्थानिक राजकीय नेत्यांनी आपल्या मर्जीतील सरपंच व्हावा, यासाठी व्युहरचना आखली होती. त्यामुळे सरपंच पदाच्या आरक्षणाची उत्सुकता शिगेला पोहचली होती.
शुक्रवारी तालुकास्तरावर उपजिल्हाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्ह्यातील ६२२ ग्रापंच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत काढण्यात आली. यात उस्मानाबाद तालुक्यातील १११, तुळजापूर १०८, उमरगा ८०, लोहारा ४४, कळंब ९१, भूम ७४, परंडा ७२ व वाशी तालुक्यातील ४२ अशा एकूण ६२२ ग्रामपंचायतच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत काढण्यात आली. या आरक्षण सोडतमुळे इच्छुकांसह प्रस्थापितांना सरपंच पदाने हुलकावणी दिली आहे. काही ठिकाणी बहुमत असताना देखील सरपंच पदाची लॉटरी विरोधी गटातील उमेदवारास लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ज्या ठिकाणी खुल्या गटास सरपंच पदाचे आरक्षण सुटले आहे. त्या ठिकाणीही सरपंच पदासाठी मोठी चुरस निर्माण झाली असून फोडाफोडीचे राजकारण रंगणार असल्याचेही स्पष्ट झाले आहे.
प्रवर्गनिहाय आरक्षण
उस्मानाबाद तालुक्यातील १११, तुळजापूर १०८, उमरगा ८०, लोहारा ४४, कळंब ९१, भूम ७४, परंडा ७२ व वाशी तालुक्यातील ४२ अशा एकूण ६२२ ग्रामपंचायतच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत काढण्यात आली. यात अनुसूचित जाती ४८, अ.जा.महिला ५३, अनुसूचित जमाती ५, अ.ज. महिला ९, नागरिकांचा मागास प्रवर्ग ८२, ओबीसी महिला ८६, खुला प्रवर्ग १६७ व सर्वसाधारण महिला प्रवर्गातील १७२ सरपंच पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले.
महत्वाच्या बातम्या
- लातूरच्या सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहिर
- अधिकाऱ्यांच्या लसीकरणानंतर शंका-कुशंका झाल्या दूर
- देवमाणसातील राक्षस; मुलगा न झाल्याने डॉक्टरकडून पत्नीसह मुलीला मारण्याचा प्रयत्न
- जयंत पाटील हे पात्रता नसताना राजकारणात आले आहेत; पडळकरांची खोचक टीका
- ‘या’ खेळाडूला KKR संघातून करारमुक्त करायला हवे होते’ गंभीरने व्यक्त केलं स्पष्ट मत !


