🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांच्या रूपाने स्त्री- पुरुष समानतेसाठी अखेरच्या श्वासापर्यंत झटलेल्या एका पर्वाची आज अखेर झाली, अशा शब्दात राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
शोकसंदेशात श्रीमती ठाकूर यांनी म्हटले आहे, पत्रकारितेतून सुरुवात केलेल्या बाळ यांनी महिलांचे प्रश्न जाणून घेऊन त्यावर सक्रिय काम करत प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेतला. ‘मिळून सऱ्याजणी’ या मासिकातून त्यांनी स्त्रियांच्या प्रश्नांना वाचा फोडली. अन्यायग्रस्त महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी त्या कायम प्रयत्नशील राहिल्या.
‘नारी समता मंच’ च्या माध्यमातून स्त्रीभ्रूण हत्याविरोधी निदर्शने, जनजागृती, ॲसिड हल्ल्याविरोधात जनजागृतीसाठी ‘दोस्ती जिंदाबाद’, विवाह परिषद, ग्रामीण-शहरी स्त्रियांची एकत्रित परिषद, कौटुंबिक समस्या मांडण्यासाठी कुटुंब नियोजन परिषद, स्त्रियांच्या जागृतीसाठी आत्मसन्मान परिषद असे अनेक उपक्रम त्यांनी राबविले.
‘बोलते व्हा’, ‘अक्षरस्पर्श ग्रंथालय’, ‘सखी साऱ्याजणी मंडळ’, ‘साथ-साथ विवाह अभ्यास मंडळ’, ‘पुरुष उवाच अभ्यासवर्ग’ अशा उपक्रमातून महिलांचा आवाज समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न केला. त्यांनी केवळ स्त्रीवादी भूमिका न मांडता स्त्री- पुरुष समानतेचे समर्थन केले. असे स्त्रियांचे आवाज बनलेले व्यक्तिमत्व आपल्यातून हरपले आहे, असे श्रद्धांजलीपर शोकसंदेशात श्रीमती ठाकूर यांनी म्हटले आहे.

