औरंगाबाद : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने ‘कोरोना’ (कोव्हीड-१९) या विषाणूच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या दृष्टिने शासनाच्या निर्देषानुसार दि.२३ ते ३१ मार्च, २०२० पर्यंत विद्यापीठ परिसर आणि उपपरिसरातील सर्व शैक्षणिक संकुल, प्रशासकीय विभाग, संलग्नित महविद्यालय, न्यू मॉडेल डिग्री कॉलेज, हिंगोली आणि कै.श्री उत्तमराव राठोड आदिवासी विकास व संशोधन केंद्र, किनवट येथील अधिकारी, कर्मचाऱ्यांची उपस्थिती ५ टक्के करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले असून शिक्षक, संशोधक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपले घरी राहून (वर्क फ्रॉम होम) विभागाचे कामकाज करावे, असे विद्यापीठाचे कुलसचिव यांनी परिपत्रकाद्वारे संबंधितांना कळविले आहे.
कोरोना’ (कोव्हीड-१९) या विषाणूचे देशभरातील वाढते संक्रमण रोखण्यासाठी दि.२३ ते ३१ मार्च, २०२० या दरम्यान प्रत्येक विभागातील फक्त ५ टक्के किंवा आवश्यकतेनुसार अधिकारी, कर्मचारी उपस्थित राहतील याची काळजी आणि उपस्थित राहणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची यादी कुलसचिव कार्यालयास सादर करावी, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. ज्या-ज्या वेळी आवश्यकतेनुसार अधिकारी, कर्मचारी यांना वरिष्ठांनी बोलाविल्यानंतर तात्काळ विभागात उपस्थित राहणे ही बंधनकारक करण्यात आले असून या कालावधीत कोणीही मुख्यालय सोडू नये, असे आदेश दिले आहेत.
दि.३१ मार्च, २०२० पर्यंत विद्यापीठ परिसर आणि उपपरिसरातील सर्व शैक्षणिक संकुल, सर्व संलग्नित महाविद्यालय, न्यू मॉडेल डिग्री कॉलेज, हिंगोली आणि कै.श्री उत्तमराव राठोड आदिवासी विकास व संशोधन केंद्र, किनवट येथील सर्व शैक्षणिक कामकाज बंद राहणार आहे. येथील शिक्षक, संशोधक, अधिकारी आणि कर्मचारी यांनी आपले घरी राहून (वर्क फ्रॉम होम) विभागाचे कामकाज करावे. पुढील सत्र, शैक्षणिक वर्षाकरिता शैक्षणिक साहित्य तयार करणे, संशोधन लेख, संशोधन पेपर व संशोधना संदर्भात इतर आवश्यक ते काम करावे. विद्यार्थ्यांना संशोधनासाठी उपयुक्त होईल असे प्रश्नसंच तयार करावे. त्याचप्रमाणे ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ अंतर्गत आवश्यक ते प्रकल्प तयार करावेत. आपल तयार केलेले स्टडी मटेरियल सर्व विद्यार्थ्यांना ई-मेल, व्हॉटस् अॅप किंवा इतर माध्यमांद्वारे उपलब्ध करून द्यावेत, जेणेकरून विद्यार्थी घरी बसून अभ्यास करतील. सर्व शिक्षकांनी घरी राहून केलेल्या कामाचा अहवाल संचालक, प्राचार्य यांना लिखित स्वरुपात द्यावयाचा आहे. आणि संकुलाच्या सर्व संचालकांनी सदर अहवाल एकत्रित करून त्याची माहिती कुलसचिव कार्यालयास सादर करावयाची आहे. संकुलातील सर्व संचालक आणि शिक्षकांनी नॅकच्या अनुषंगाने आवश्यक ती कामे दि. दि.३१ मार्च, २०२० पर्यंत आपले घरी राहून (वर्क फ्रॉम होम) पूर्ण करावीत असेही परिपत्रकात म्हटले आहे.
जे विद्यार्थी अद्यापही वसतिगृहात राहात आहेत, त्यांनी आणि विशेषतः वसतिगृहात राहणाऱ्या परदेशातील विद्यार्थ्यांनी वसतिगृहात राहून सुरक्षितते संबंधी आवश्यकती काळजी घ्यावी, असेही सांगण्यात आले असून अधिक माहितीकरिता विद्यापीठ संकेतस्थळाला भेट द्यावी, असे विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे.


