नवी दिल्ली : जगभरात कोरोनाने थैमान घातल्या नंतर काही देशांमध्ये कोरोना कमी होत आहे. त्यामुळे अनेक देश पूर्ववत होण्यासाठी लॉकडाऊन उठवत आहेत. मात्र जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) लॉकडाऊन उठवण्याबाबत काही सूचना केल्या आहेत. तर कोरोना अजून गेला नसून यासाठी एका विशिष्ट पद्धतीने लॉकडाऊन काढायचे आहे. अन्यथा कोरोना अजून वाढेल आणि नाईलाजाने पुन्हा लॉकडाऊन ठेवावे लागेल, असा धोका जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस ऍधानॉम घेबरेयेसस यांनी बोलून दाखवला आहे.
ते म्हणाले की, सर्व देशांनी काळजी घेण्याची गरज आहे. लॉकडाउन लगेचच शिथील न करता टप्प्याटप्प्याने उठवण्याची गरज आहे. निर्बंध शिथील झाल्यानंतरही लोकांवर लक्ष ठेवण्याची गरज असून आरोग्य यंत्रणाही तयार असली पाहिजे. जर पूर्वकळजी घेतली नाही तर परिस्थिती अजून गंभीर होण्याची शक्यता असून पुन्हा एकदा संपूर्ण लॉकडाउन करावा लागेल.
करोनाचा प्रादुर्भाव नक्की कमी होईल, पण त्यानंतर जनजीवन पूर्वीप्रमाणे राहणार नाही. आपण घाबरुन जगू शकत नाही, पण त्याचवेळी तयार राहणं गरजेचं आहे. आपण एकीकडे या महामारीशी लढा देत असताना दुसरीकडे अशा साथींचा सामना कऱण्याची तयारीही केली पाहिजे. जगभरातील आरोग्य यंत्रणा भक्कम करण्यासाठी ही योग्य संधी आहे, असेही टेड्रोस म्हणाले.
दरम्यान आतापर्यंत अनेक देशांनी आरोग्य यंत्रणांकडे दुर्लक्ष केलं होत. मात्र आता कोरोनाने आपल्याला आपली चूक लक्षात आणून दिली आहे. त्यामुळे आता प्रत्येक देशाने आरोग्य यंत्रणेत गुंतवणूक करणे आवश्यक आहे. ही गुंतवणूक नक्कीच फायदेशीर आहे. जी आपले प्राण वाचवण्यासाठी उपयोगी पडणार आहे, असेही टेड्रोस म्हणाले.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

