🕒 1 min read
नांदेड : लॉकडाऊनमुळे राज्यात अडकलेल्या लोकांना आपल्या मूळ गावी परतण्यासाठी शासनाने परवानगी दिली आहे. त्यानंतर नांदेडहून काही भाविक पंजाबमध्ये परतले होते. त्यापैकी 351 लोकांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. तर नांदेडमध्ये देखील कोरोनाचा आकडा अचानक वाढला आहे. नांदेडहून आलेल्या भाविकांमुळं पंजाबमध्ये कोरोना पसरला असल्याचं पंजाब सरकारनं म्हटलं आहे.
प्रवासाला सुरुवात होण्याआधी यात्रेकरुंची फक्त तपासणी करण्यात आली मात्र महाराष्ट्र सरकारने करोना चाचणी केली नाही म्हणून पंजाब सरकार नाराज आहे. पंजाबचे आरोग्यमंत्री बलबीर सिंग सिद्धू यांनी पत्र लिहून आपली नाराजी महाराष्ट्र सरकारला कळवली आहे.
“आम्हाला त्यांनी सांगितले असते, तर आम्ही आमची टीम तिथे पाठवून करोना चाचणी केली असती. नागरिक कुठल्याही राज्याचा असला तरी आम्ही तपासणी करत आहोत” असे सिद्धू यांनी पत्रात म्हटले आहे.४० दिवसांपासून पंजाबमधील नागरिक नांदेडमध्ये अडकले होते. पण त्यांची साधी तपासणी केली नाही म्हणून पत्रातून निषेध नोंदवला आहे.
दरम्यान,नांदेडमध्ये पंजाबच्या चुकीमुळं कोरोना पसरला असल्याचा आरोप मंत्री अशोक चव्हाण यांनी केला आहे. यावरुन पंजाब आणि महाराष्ट्र सरकार आता आमने-सामने आलं आहे.विशेष म्हणजे दोन्ही ठिकाणी कॉंग्रेस सत्तेत असून दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोप सुरु झाल्याने नेमके खरे कोण बोलत आहेत आता याबद्दल प्रश्न उपस्थित होत आहे.


