मुंबई : गृहमंत्रालयाने देशातील रेड, ऑरेंज, ग्रीन झोनमधील दारूची दुकानांवरील निर्बंध उठवले आहेत. त्यामुळे आज देशभरातील अनेक दारुची दुकानं उघडली असून तळीरामांनी अगदी प्रथम कर्तव्य मानत दारू खरेदीसाठी लांबच लांब रांगा लावल्या असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. छत्तीसगडमध्ये तर तळीरामांनी दारू खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी केली आहे. तर यामध्ये सोशल डीस्टंंसिंगच्या नियमाचे उल्लंघन केले आहे.
महाराष्ट्रातही दारू विकण्यास परवानगी मिळाली आहे. मात्र मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद येथील दारूची दुकानं बंदचं ठेवली आहेत. तर कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून वाईन शॉप सुरु होणार आहेत. वाईन शॉप बंद असतानाच दुकानाबाहेर काही मद्यपी घुटमळत होते. तर वसई, विरार आणि नालासोपारामध्येही वाईन शॉपबाहेर लोकांच्या सकाळपासून रांगा लागल्या होत्या.
ठाण्यात वाईन शॉप सुरु होणार नसल्याचे सांगत पोलीस रांग लावल्यास कारवाई करण्याचा इशारा देत आहेत. तर नवी मुंबईतही वाईन शॉप सुरु होणार नाहीत, अशी माहिती महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी दिली.
दरम्यान छत्तीसगडमध्येही दारूची दुकानं उघडली आहेत. तर राजनांदगाव भागात दारुच्या दुकानाबाहेर मोठ्या संख्येने लोकांनी रांगा लावल्या. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पायदळी तुडवले गेले. काही जणांनी मास्क लावले होते, मात्र अक्षरशः एकमेकांना चिकटून उभे राहिल्याने सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. ग्राहकांनी एकमेकांपासून सहा फुटांचे अंतर राखावे लागणार आहे. तसेच एकावेळी पाचपेक्षा अधिक ग्राहक दुकानात नसतील, याची खबरदारी दुकानदारांना घ्यावी लागणार आहे. मात्र इथे सर्रास हे नियम धाब्यावर बसवल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

