नागपूर : “विनंती करुनही घराबाहेर पडत असाल तर आम्ही जबरदस्तीने तुम्हाला घरी बसवू, ती वेळ आणू नका, आता विनंती करतोय, जबरदस्ती करायला लावू नका, आताच मदत करा, जबरदस्तीची वेळ आणू नका” असा इशारा नागपूरचे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नागरिकांना दिला आहे.
कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्यसरकारने या चारही प्रमुख शहरे लॉकडाऊन केली आहेत. रस्त्यावर गर्दी होऊ नये, गर्दीमुळे संसर्गाचा धोका सर्वाधिक असतो. मात्र वारंवार सूचना देऊनही रस्त्यावरील गर्दी न हटल्याने, नागपूर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे हे अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. ”नागपूर शहराला लॉक डाऊन करण्याची प्रक्रिया सुरु झाली असून मी अनेक भागाचा दौरा केला. दुकानं बंद झाली असली तरी रस्त्यावर वाहने आणि नागरिक दिसून येत आहेत हे चुकीचं आहे. नागरिकांनी गांभीर्याने घेतलं नाही. होम क्वारंटाईन हे जनतेसाठी आहे.” अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे.
मात्र, लॉकडाऊनचा अर्थ केवळ दुकानं आणि कार्यालये बंद करणे असा नाही, तर लोकांनीही घराबाहेर न पडणे असा आहे. लोकांनी घरी बसणे गरजेचं आहे, वारंवार आवाहन करुनही नागरिकांना गांभीर्य नाही. आपण आपल्या सुरक्षेसाठी, जनतेच्या सुरक्षेसाठी घरात थांबा. बाहेर फिरल्याने जर संसर्ग झाला तर त्यानंतर काळजी घेण्यापेक्षा आधीच काळजी घेतलेली बरी, माझी विनंती आहे, घराबाहेर पडू नका, असं तुकाराम मुंढे म्हणाले.
तरी जनता रस्त्यावर येणार असेल तर याचा दुष्परिणाम होईल. आरोग्याचा धोका निर्माण होऊ शकतो. मी पुन्हा विनंती करतो की नागरिकांनी घराबाहेर पडू नका. नाही तर आम्हाला फोर्स करून तुम्हाला घरी बसायला लावावं लागेल. आता तुमच्या हातात आहे, तुम्ही स्वतः हे करता की आम्ही तुमच्यावर फोर्सफुली अॅक्शन घ्यायची, अशी विचारणा तुकाराम मुंढे यांनी केली.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

