पुणे : देशात आणि राज्यात आजपासून तिसरा लॉकडाऊन कालावधी सुरु झाला आहे. मात्र राज्य सरकारने लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्यात काही ठिकाणी शिथिलता दिली आहे. मात्र नागरिक मिळालेल्या शिथिलतेचा गैरफायदा घेत असून सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणत गर्दी करताना दिसत आहेत.
अशीच गर्दी आज पुण्यातही पाहिला मिळाली. संचेती रुग्णालयाच्या समोरच्या चौकात नागरिकांनी वाहन घेऊन तोबा गर्दी केली. तर वाहनांच्या रांगा या लांबच लांब गेल्या. यावेळी उपस्थित असणारे पोलीसही हतबल झाले. तर नागरिकांना बाहेर पडण्याचे कारण विचारले असता भाजी घेण्यास आलोय, मेडिकलमध्ये आलोय अशी काहीही कारणंं त्यांच्याकडून मिळाली. नागरिकांनी अशीच जर लपर्वाई दाखवली तर कोरोना अधिक बळावू शकतो, असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.
पुणे, पिंपरी चिंचवड, मुंबई , ठाणे , कल्याण डोंबिवली, औरंगाबाद , नाशिक , नागपूर ही प्रमुख शहर अजूनही कोरोनाच्या विळख्यात अडकली आहेत. तरी देखील नागरिक मोठ्या संख्येने शासनाने घातलेल्या नियमांचे उल्लंघन करताना दिसत आहेत.
अशा नियम भंग करणाऱ्या नागरिकांना राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी इशारा दिला आहे. नियमांचे पालन करा अन्यथा अजून कडक नियम करण्यात येतील, असे ते म्हणाले आहेत. दरम्यान आज कोल्हापूर आणि कागलमध्ये ही अशीच गर्दी पाहिला मिळाली यावरूनच त्यांनी नागरिकांना इशारा दिला.
ते म्हणाले की, सव्वा महिना लॉकडाऊनमुळे शुकशुकाट होता, आज ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये थोडी शिथिलता मिळाल्यानंतर जणू काही कोरोना संपलेला आहे, हद्दपार झालेला आहे आणि त्याच्यावर आपण विजय मिळवला आहे अशा थाटात आज बाहेर पडत आहेत. ते चुकीचे आहे.नियमांचे पालन करा अन्यथा प्रशासनासमोर अजून कडक लॉकडाऊन करण्याशिवाय कोणताच पर्याय राहणार नाही.


