🕒 1 min read
धुळे : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाउन करण्यात आलं आहे. त्यामुळे ठिकठिकाणी लोकं अडकली आहे. राजस्थानमधील कोटा येथे महाराष्ट्रातील विद्यार्थी अडकले होते. अखेर या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात परत आणण्यासाठी लालपरी धावून आली आहे.
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे देशभरात लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. दळण-वळणाची साधने बंद झाली. त्यामुळे महाराष्ट्रातील सुमारे दीड हजारांवर विद्यार्थी कोटामध्ये अडकले आहेत. या विद्यार्थ्यांना माघारी आणण्यासाठी विद्यार्थ्यांचे पालकांनी शासनास विनंती केली होती. लॉकडाउनच्या काळात देशभरात संचारबंदी लागू असल्याने तसेच राज्यातही जिल्हाबंदी असल्याने कोणालाही पूर्वपरवानगी शिवाय परजिल्ह्यात जाता येत नाही.
अशा परिस्थितीत परराज्यातून राज्यातील विद्यार्थ्यांना आणण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला. यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, परिवहन मंत्री ॲड अनिल परब यांनी केंद्र शासन आणि राजस्थान सरकारशी चर्चा करुन कोटा येथे अडकलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांना आणण्यासाठी यशस्वी बोलणी करुन आज महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या धुळे आगारातून 70 बसेस रवाना केल्या आहेत. दोन दिवसांत या बस विद्यार्थ्यांना घेवून माघारी येतील.
कोटामधील (राजस्थान) विद्यार्थ्यांना लवकरात लवकर माघारी आणण्याची विद्यार्थ्याच्या पालकांची मागणी लक्षात राज्य शासनाने राज्याच्या उत्तर सीमेवरील आणि कोटाजवळचा जिल्हा म्हणून धुळे जिल्ह्यातून बसेस सोडण्याचे नियोजन केले. यासाठी राज्याचे महसूल राज्यमंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अब्दुल सत्तार यांनी परिवहनमंत्री यांचेशी चर्चा करुन धुळे जिल्ह्यातील 70 बसेस उपलब्ध करुन देण्याची तयारी दर्शविली आणि आज त्याची अंमलबजावणी झाली. त्यानुसार, आज धुळे येथून 70 बसेस कोटाकडे रवाना झाल्या आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
