मुंबई : आज राज्यात कोरोना बाधित २३२ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या २९१६ झाली आहे. आज दिवसभरात ३६ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात २९५ रुग्ण बरे झाले आहेत. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ५२ हजार नमुन्यांपैकी ४८ हजार १९८ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करिता निगेटिव्ह आले आहेत तर २९१६ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ६९ हजार ७३८ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ५६१७ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
राज्यात आज ९ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी मुंबईचे २, पुण्यातील ६ तर अकोला मनपा येथील १ रुग्ण आहे. त्यात ६ पुरुष तर ३ महिला आहेत. आज झालेल्या ९ मृत्यूपैकी ४ जण हे ६० वर्षांवरील आहेत ३ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ६० या वयोगटातील आहेत. तर दोघेजण ४० वर्षाखालील आहेत. मृत्युमुखी पडलेल्या ९ जणांपैकी ६ रुग्णांमध्ये (६७ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, अस्थमा, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता १८७ झाली आहे.
राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात आज एकूण ५३९४ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी २० लाखाहून अधिक लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
