🕒 1 min read
नवी दिल्ली : २०१४ नंतर काँग्रेसला राष्ट्रीय पातळीसह राज्यपातळीवर देखील उतरली कळा लागल्याचं दिसून आलं होतं. २०१९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये देखील भाजपने एकहाती बहुमत मिळवून मोदी सरकार २.o चं सरकार स्थापन केलं. यानंतर, भाजपला इतर राज्यात यश मिळत असताना महाराष्ट्रात मात्र सर्वात मोठा पक्ष बनून देखील सत्ता स्थापन करण्यात अपयश आलं होतं.
संधीचा फायदा घेत शिवसेनेसोबत राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसने महाविकास आघाडीच्या छत्राखाली एकत्र येत सत्ता स्थापन केली. भिन्न विचारसरणी असलेल्या शिवसेनेसोबत सत्तेत सहभागी होण्याआधी काँग्रेसने काहीशी मुत्सद्दी भूमिका घेतली होती. तर, गेल्या वर्षभरात सत्तेत असून देखील दुय्यम वागणुकीमुळे नाराजी उघड केली.
या सर्व घडामोडींमध्ये काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. सद्या औरंगाबादच्या नामांतरावरून बाळासाहेब थोरात यांनी विरोधी भूमिका घेतल्याने शिवसेना व काँग्रेसमध्ये ठिणगी पडण्याची चिन्हे आहेत. अशातच आता थोरात प्रदेशाध्यक्ष पदावरून पायउतार होतील अशा हालचाली सुरु झाल्या आहेत.
थोरात कोणत्याही क्षणी प्रदेशाध्यक्षपद सोडतील आणि नव्या प्रदेशाध्यक्षाची हायकमांडकडून घोषणा केली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. बाळासाहेब थोरात काल रविवारपासून दिल्लीत आले आहेत. दिल्लीत त्यांनी काँग्रेसच्या काही बड्या नेत्यांची भेट घेऊन चर्चाही केली. यानंतर त्यांनी काँग्रेसचे नेते व राज्यसभा खासदार राजीव सातव यांच्याशी देखील चर्चा केली.
थोरात यांच्याकडे महसूल खात्याची जबाबदारी आहे. हे खातं देखील प्रशासनाचा गाढा हाकण्यासाठी महत्वाचं असून थोरातांना प्रदेशाध्यक्ष पद व या खात्यासाठी पुरेसा वेळ मिळत नसल्याचं दिसून येत आहे. महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांकडून दिल्लीत जाऊन प्रदेशाध्यक्ष बदलाची मागणी केली जात असल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळेच स्वतः बाळासाहेब थोरात हा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, थोरात यांच्या नंतर प्रदेशाध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार? यावरून देखील उत्सुकता लागली आहे. काँग्रेसचे नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व राजीव सातव यांची नवे या स्पर्धेत आहेत. सातव सद्या राज्यसभेत खासदार आहेत. तर पृथ्वीराज चव्हाण हे आमदार असून मंत्रिमंडळात त्यांचा समावेश केलेला नाही. त्यामुळे प्रदेशाध्यक्षपदी या दोघांपैकी कोणाची वर्णी लागेल याचा निर्णय ‘हायकमांड’चं घेईल.
महत्वाच्या बातम्या
- पीसीएमसी ते फुगेवाडी या सहा किलोमीटर मार्गावर मेट्रोची चाचणी पूर्ण
- काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी कोरोना लसीला मान्यता देण्याच्या प्रक्रियेवर केले ‘हे’ प्रश्न उपस्थित
- …तर महाराष्ट्राचेही नामांतर करा; महाविकास आघाडीतील घटक पक्षाची राज्य सरकारकडे मागणी
- फुले वाड्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी महाविकास आघाडीचे सरकार कटिबद्ध – धनंजय मुंडे
- फडणवीस विरोधी पक्षनेते पण ‘चायपेक्षा किटली गरम’; शिवसेनेची भाजप नेत्यांवर जहरी टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
