टीम महाराष्ट्र देशा : उसाचे उत्पादन घटल्यामुळे व गळीत हंगाम उशिरा सुरू होणार असल्याने ऊसतोड कामगारांचे स्थलांतर लांबले आहे. जिल्ह्याच्या अनेक भागांतील ऊसतोड मजुरांचे पश्चिम महाराष्ट्रातील कारखान्याकडे काहीसे स्थलांतर सुरू आहे, तर काहींचे स्थलांतर पुढील आठ ते दहा दिवसांत होण्याची शक्यता आहे. यावर्षी कारखान्यांचा गळीत हंगामही तीन ते चार महिनेच चालणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.
दरवर्षी जिल्ह्यातून ऊसतोडणीस जाणाऱ्या मजुरांची संख्या अधिक असते. यंदा मात्र गावातच शेतीचे काम उपलब्ध असल्याने मजुरांकडून गावात कामे करण्यावर त्यांची पसंती आहे. त्याचबरोबर यामध्ये येणाऱ्या आर्थिक अडचणीही असल्याने दरवर्षी जाणाऱ्या मजुरांचे स्थलांतर घटले आहे. जिल्ह्याची ओळख राज्यात ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक खेड्यातील सत्तर टक्क्यांपर्यंत लोक ऊसतोड मजूर म्हणून पश्चिम महाराष्ट्रातील कारखान्यावर दरवर्षी जातात. ऊसतोड मजुराचे स्थलांतर सुरू झाल्यानंतर गावात फक्त वयोवृद्ध आणि शालेय मुले राहतात. यंदा ऊसतोड मजुरांचे स्थलांतर सुरू झाले आहे.
यावर्षी दुष्काळामुळे अनेक भागांतील ऊस छावण्यातील गुरांच्या चाऱ्यासाठी वापरला गेला होता. सुरवातीस पाऊसही अपुरा होता. यामुळे उसाची लागवड कमी झाली. अपुऱ्या उसामुळे कारखाने जास्त दिवस चालणार नाहीत. दरवर्षी दिवाळीपूर्वी कारखाने सुरू होतात. त्यामुळे दिवाळीपूर्वीच कामगार ऊसतोडणीस जात असे. ऊसतोड कामगारांची दिवाळी नेहमी फडात साजरी होत असे; परंतु यावर्षी दिवाळी घरीच साजरी करण्यात आली.
दिवाळीनंतर एक महिन्यानंतर ऊसतोड मजूर ऊसतोडणीस निघाले. शाळकरी मुले, वृद्ध आणि शेतीची कामे पाहण्यासाठी काही माणसे गावाकडे थांबणार आहेत. उर्वरित लहान मुले, महिलांसह ऊसतोड मजूर स्थलांतर करीत आहेत. ऊसलागवड कमी असल्यामुळे यावर्षी कारखाने जास्त दिवस चालणार नाहीत. त्यामुळे मुकादमाने उचल कमी प्रमाणात दिली आहे. अशा सर्व समस्या ऊसतोड कामगारांसमोर असल्याने स्थलांतराचे प्रमाण कमी होत आहे.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1199676120397832192?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1199675922288238593?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

