रायगड – रायगड जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलेल्या पथकाकडे केंद्र शासनाने एनडीआरएफ निकषात बदल करून सुधारित निकषानुसार मदत करावी अशी मागणी राज्यमंत्री अदिती तटकरे यांनी आज केलं.
चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून विस्थापितांना कायमस्वरूपी निवारा घरे मिळण्यासाठी निकषात बदल करणे आवश्यक असल्याचं तटकरे यांनी सांगितलं. परसबागेसाठी विशेष मदतीचे पॅकेज केंद्र शासनाने जाहीर करावं असंही त्या म्हणाल्या. जिल्ह्यात झालेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाने आज नागाव, आक्षी, येथील शेतकऱ्यांना भेटून नुकसानीची पाहणी केली.
रायगड जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून केंद्र शासनाकडून मोठ्या प्रमाणत मदतीची अपेक्षा आहे. केंद्र शासनाने एनडीआरएफ निकषात बदल करून सुधारित निकषानुसार मदत करावी, अशी मागणी आदिती तटकरे यांनी केंद्रीय पथकाचे अध्यक्ष रमेश कुमार जी (सह सचिव, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण) यांना निवेदनाद्वारे केली.
तटकरे म्हणाल्या, 1891 नंतरचे सर्वात मोठे असे चक्रीवादळ दि. 3 जून 2020 रोजी झाले आहे. फयान, सायक्लॉन वादळाचा मुंबईवर मोठा परिणाम झाला होता. एनडीआरएफ व एसडीआरएफची सध्याचे निकष निसर्ग सारख्या चक्रीवादळाला पुरक नाहीत. केंद्र शासनाकडून नुकसानग्रस्तांना देण्यात येणारी भरपाई ही सध्याच्या निकषानुसार अपुरी आहे. भविष्यात निसर्ग सारखे चक्रीवादळ पुन्हा आल्यास विस्थापित लोकांसाठी कायमस्वरूपी निवारा घरे ही काळाची गरज आहे. म्हणून निकषात बदल करून अंतर्गत निवारा गृहांच्या बांधकामांना मंजुरी देणे आवश्यक आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

