मुझफ्फरनगर : कोरोनाने केवळ भारतातच नव्हे तर जगभरात आपले हातपाय पसरले आहेत. पोलीस,प्रशासकीय अधिकारी,राज्य सरकार,केंद्र सरकारकडून नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मात्र तरीही काही महाभाग बेफिफिरपणे बाहेर फिरताना दिसत आहेत.काही नागरिक रस्त्यावर फिरून सर्वांची डोकेदुखी वाढवत असताना आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
देशव्यापी लॉकडाउन दरम्यान देशात विविध ठिकाणी अडकलेले लोक आपापल्या घरी जाण्याचा प्रयत्न करीत आहेत. यासाठी काही लोक घरी जाण्यासाठी चुकीच्या मार्गाचा अवलंब करतानाही दिसत आहेत. उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगरमधील एका तरूणाला कसेही करून लग्न करायचे होते. त्याने शक्कल लढवत वडिलांच्या आजारपणाची बतावणी केली आणि रुग्णवाहिकेतून दिल्लीला पोहोचला. तेथेच त्यांचे लग्न झाले. लग्नानंतर तो आपल्या पत्नीला रूग्णवाहिकेत बसवूनच घरी घेऊन आला. मात्र, आता त्याचे संपूर्ण कुटुंब क्वारंटीन ठेवण्यात आले आहे.
२६ वर्षांच्या अहमदने दिल्लीला जाण्यासाठी अॅम्बुलन्स बुक केली. त्याने त्याचे वडील आजारी असल्याचा बहाना बनविला आणि त्यांना ड्रिप लावून स्ट्रेचरवर झोपविले. वाटेत त्याने कित्येक चेक पोस्ट, पोलिसांना थापा मारत दिल्ली गाठली. दिल्लीला गेल्यानंतर त्यांने तिथे ठरलेल्या मुलीसोबत लग्न केले. यानंतर तो जसा गेला तसा अॅम्बुलन्सनेच नववधूला घेऊन माघारी आला.
दरम्यान,अहमदचा आनंद फार काळ टिकला नाही. शेजाऱच्या कोणीतरी पोलिसांना याची माहिती दिली आणि पोलखोल झाली. यासर्व धक्कादायक प्रकारामुळे प्रशासनाची मात्र चांगलीच तारांबळ उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
