बारामती : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे आज अनेकजण कुठेना कुठे तरी अडकले आहेत. बारामातीतले देखील 14जण हे उत्तरप्रदेशला अडकले होते. मात्र खा. सुप्रिया सुळे यांनी स्वतः लक्ष घालून त्यांना परत घरी आणले आहे. तर हे नागरिक अडकल्याची माहिती सुप्रिया सुळे यांना स्थानिक राजकारणातील विरोधक नगरसेवक सुनील सस्ते यांनी दिली होती. मात्र राजकारण बाजूला ठेवत सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणात लक्ष घालत अडकलेल्या नागरिकांना आपल्या घरी परत आणले. याबाबतचे वृत्त ‘सरकारनामा’ने प्रसिद्ध केले आहे.
बारामतीतील खंडोबानगर येथे राहणारे रेशमा राजू आतार, मुसकान राजू आतार, साहिल राजू आतार, जिलानी रमजान शेख, शाहिन जिलानी शेख,सलिम रमजान शेख,चांदणी सलिम शेख, नईम सलिम शेख, सुमैया शाहिद शेख, आयेशा आलाऊदिन पठान, आरिफ आलाऊदिन पठान, आशाबानू नसिर सूतार ,मुनीर नसिर सूतार, सलमान जाफर शेख हे चौदा जण उत्तर प्रदेशातील बसती जिल्ह्यातील भानपूर तालुक्यातील कनथुई या गावात 18 मार्चपासून अडकून पडले होते. एका विवाहसमारंभासाठी हे सगळे तिकडे गेले होते.
बारामतीतील पुनावाला गार्डनसमोर खेळणी विकून ही मंडळी उदरनिर्वाह करतात. लॉकडाऊनमध्ये अडकून पडल्याने त्यांची पंचाईत झाली होती. त्यांनी नगरसेवक सुनील सस्ते यांच्याशी संपर्क साधला. सस्ते यांनी सुप्रिया सुळे यांचे स्वीय सहायक नितिन सातव यांच्या मार्फत सुळे यांच्याशी संपर्क केला.
बारामतीतील काही परप्रांतियांना सोडण्यासाठी एक गाडी लखनऊला जाणार होती. याच गाडीतून हे 14 जण परत येऊ शकत होते मात्र जिल्हाधिका-यांच्या परवानगीची गरज होती. सुप्रिया सुळे यांनी तातडीने हालचाली करुन ही परवानगी मिळवून दिली व आज हे 14 जण नाशिकमार्गे बारामतीत परतले.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

