औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व अत्यावश्यक सेवा जसे किराणा दुकाने, दुध, ऑईल व पेट्रोलियम व उर्जा संसाधने (पेट्रोल पंप), गॅस एजन्सी, धान्य दुकान, जिह्यातील सर्व स्वस्त धान्य दुकान, फळे, दुग्धोत्पादन, भाजीपाला, भाजी मंडी भाजी मार्केट हे सर्व जिवनावश्यक वस्तू विक्री करणारे ठिकाणे निरंतर सुरू राहणार आहे. जिल्ह्यात सर्व प्रकारचा अन्न धान्याचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. तसेच अन्न धान्याची वाहतुक, पेट्रोल, डिझेलची वाहतुक व इतर जिवनावश्यक वस्तुची वाहतुक निरंतर चालु राहणार आहे. तरी नागरिकांनी वरीलपैकी अत्यावश्यक वस्तू आवश्यकतेपेक्षा जास्तीच्या साठवणूक करून ठेवू नये व कोणतेही दुकान, पेट्रोल पंप येथे गर्दी करू नये. तसेच कोरोना व्हायरस पसरणार नाही याबाबत आवश्यक ती खबरदारी घेण्यात यावी. आवश्यकता असेल तेव्हाच घराबाहेर पडावे, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी, औरंगाबाद यांनी केले आहे.
दरम्यान, राज्यामध्ये कोरोना विषाणूंच्या संक्रमणामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत राज्य शासनाने कार्यालयीन उपस्थिती 5 टक्के ठेवणेबाबत आदेशित केले आहे. या पार्श्वभूमीवर चालू आर्थिक वर्षअखेर कोषागार कामकाजाचे नियमन करण्याच्या दृष्टीने सर्व जिल्हा कोषागारे, उपकोषागारे व अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई येथे चालू आर्थिक वर्षातील अनुदानाशी निगडित देयके स्वीकृती केवळ दिनांक 27 मार्च 2020 पर्यंतच चालू ठेवणेबाबत वित्त विभागाने निर्देश दिलेले आहेत.
त्यानुसार सर्व जिल्हा कोषागारे, उपकोषागारे व अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई येथे दिनांक 27 मार्च 2020 पर्यंतच चालू आर्थिक वर्षातील अनुदानाशी निगडित देयके स्वीकारण्यात यावीत. तद्नंतर केवळ कोरोना आजाराशी निगडित बाबींची देयके वगळता अन्य कोणत्याही प्रकारची देयके स्वीकृत करण्यात येऊ नयेत. अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई आणि जिल्हा कोषागारे व उपकोषागारे यांच्या अधिनस्त सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांनी याची नोंद घ्यावी असे, संचालक लेखा व कोषागारे, मुंबई यांनी कळविले आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

