जळगाव : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे. राज्यभरातून १७ लाख ६५ हजार ८९८ विद्यार्थी ही परीक्षा देत आहे. मात्र परीक्षेच्या पहिल्याच दिवशी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
जळगावातील मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा काकोडा परीक्षा केंद्रावर मराठीचा पेपर फुटला. धक्कादायक म्हणजे फुटलेला पेपर कॉपीबहाद्दरांच्या व्हॉट्सअपवर पोहोचला. तालुक्यातील एका केंद्रावर मोठ्या प्रमाणात कॉपीबहाद्दरांना सुळसुळाट आहे.
या धक्कादायक प्रकारामुळे शिक्षण विभागाच्या कामाकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. तर, शिक्षण मंडळच्या सचिवांनी परीक्षेसंबंधी दिलेल्या आदेशांकडे केंद्र प्रमुखांनी दुर्लक्ष केल्याचे या प्रकारातून दिसून आले आहे.
दरम्यान, यंदा विद्यार्थी संख्या ६५ हजार ८५ ने वाढली आहे. गेल्या वर्षी दहावीचा निकाल घटल्याने यंदापासून पुन्हा विद्यार्थ्यांना अंतर्गत गुण देण्यात येणार आहेत.


