🕒 1 min read
उस्मानाबाद : सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वेमार्गासाठी आर्थिक वर्षात केंद्र सरकारने २२ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. पण राज्य सरकारने समप्रमाणात हिस्सा जमा न केल्यास या प्रकल्पाचे काम बंद पडू शकते. त्यामुळे राज्य आकस्मिक निधीतून तातडीने २२ कोटी रुपये उपलब्ध करून देण्यासाठी सर्व संबंधितांची ऑनलाईन बैठक बोलवावी, अशी मागणी भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
या संदर्भात आमदार पाटील यांनी म्हटले आहे की, तुळजापूर तीर्थक्षेत्र रेल्वेमार्गाने जोडावे, ही देशभरातील भाविकांसह या भागातील नागरिकांची अनेक वर्षांची मागणी आहे. मागणीची दखल घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद हा ८४.४४ किलोमीटर लांबीचा व ९०४.९२ कोटी रुपये किमतीचा रेल्वे मार्ग मंजूर करून २०१९ मध्ये या कामाचे भूमिपूजन केले.
हा प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावा, यासाठी राज्यातील इतर महत्त्वाच्या प्रकल्पाप्रमाणे खर्चाचा ५० टक्के हिस्सा उचलण्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१९ मध्ये मान्य केले होते. यानुषंगाने तत्कालीन रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना कळविले होते. तसेच तत्कालीन प्रधान सचिव गृह (परिवहन व बंदरे) यांनी रेल्वे बोर्डाचे सदस्य मुकेश कुमार गुप्ता यांना याबाबतची राज्य सरकारची अधिकृत सहमती कळविली होती.
केंद्र सरकारने आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये या प्रकल्पासाठी रु.२२ कोटी ची तरतूद केली आहे. प्रकल्पाचे काम सुरळीतपणे सुरू रहावे यासाठी समप्रमाणातील राज्याच्या हिस्याच्या रकमेची तरतूद करण्याबाबत रेल्वे विभागाचे मुख्य अभियंता (बांधकाम) यांनी प्रधान सचिव गृह (परिवहन व बंदरे) यांच्याकडे मागणी केली आहे. या रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षण व भुसंपादनाच्या कामाला सुरुवात देखील झाली आहे.
परंतु परिवहनमंत्री अनिल परब यांनी सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वेमार्ग संपूर्णतः केंद्र शासनाच्या आर्थिक सहभागाने होणार असल्याने राज्य शासनाने निधी देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे तथ्यहीन विधान याबाबतच्या तारांकीत प्रश्नाला उत्तर देताना विधानसभेमध्ये केले होते. राज्याने ५० टक्के हिस्सा देण्याचे मान्य केल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर देखील त्यांची नकारात्मकता दिसून येत असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
- कोरोनामुळे नर्सी नामदेवची आषाढी एकादशीची यात्रा रद्द
- बीड ते अहमदनगर महामार्ग चौपदरीकरणाला नितीन गडकरींकडून हिरवा कंदील
- ‘खत-बियाण्यांचा तुटवडा भासू नये याची खबरदारी घ्या’, आ.धस यांच्या ‘महाबीज’ला सूचना
- कोरोनामुळे वैधव्य आलेल्या महिलांना विशेष पॅकेजसाठी पाठपुरावा करणार-खा.सुप्रिया सुळे
- चेंबूर दुर्घटना; ‘मृतांच्या कुटुंबीयांना मनपाने दहा लाखांची मदत द्यावी’, आठवलेंची मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
