🕒 1 min read
पुणे : भारताच्या, महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाचे संशोधन व अभ्यास आणि त्याचा प्रत्यक्ष उपयोग आपण म्हणावा तसा करुन घेतला नसल्याची खंत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी व्यक्त केली. भांडारकर संस्था आणि स्नेहल प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रकाशित झालेल्या शिवराज भूषण ग्रंथाच्या प्रकाशन समारंभ प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर संस्थेचे नियामक परिषदेचे अध्यक्ष व ज्येष्ठ उद्योगपती अभय फिरोदिया, संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष भूपाल पटवर्धन, ग्रंथाचे लेखक डॉ. केदार फाळके, माजी खासदार प्रदीप रावत, ज्येष्ठ इतिहासतज्ञ पांडुरंग बलकवडे, डॉ. गो. बं. देगलूरकर, अॅड. सदानंद फडके व स्नेहल प्रकाशनचे रवींद्र घाटपांडे उपस्थित होते. या कार्यक्रमात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना पद्मविभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा भांडारकर संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
बाबासाहेब पुरंदरे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडे शौर्याबरोबरच विलक्षण प्रतिभा आणि बुध्दीमत्ता देखील होती आणि त्याच जोरावर त्यांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केले. पराक्रमी हिंदू राजा म्हणून ओळख असली तरी त्यांनी कधीही कोणत्याही धर्म, जात, संप्रदायाचा द्वेष केला नाही. शिवरायांच्या पराक्रमाची, त्यांच्या कार्याची माहिती करुन घेण्यासाठी, संशोधन करण्यासाठी जगभरातून संशोधक येत आहेत, आपण मात्र तितकासा अभ्यास केलेला नाही असं ते म्हणाले.
पुढे बोलताना पुरंदरे म्हणाले, आपला सुप्त समाज दिवसेंदिवस सुन्न होत चालला आहे. शिवाजी महाराजांच्या चरित्राकडे डोळसपणे पाहण्याची गरज आहे. केवळ उपचार म्हणून शिवजयंती साजरी न करता महाराजांना समजून घेवून त्यांच्या जीवनातील छोट्या-मोठ्या प्रसंगांचा अंगिकार करण्याची नितांत आवश्यकता आहे


